'माझ्या मुलाला न्याय द्या,' 14 वर्षीय प्रेम शिंदेच्या वडिलांचं आमरण उपोषण; एका महिन्यात काय घडलं?

प्रेम शिंदे याच्या अंगावर मारहाण झाल्याच्या 25 ते 30 जखमा आहेत. आश्रमातील महाराजांनी बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 29, 2023, 01:03 PM IST
'माझ्या मुलाला न्याय द्या,' 14 वर्षीय प्रेम शिंदेच्या वडिलांचं आमरण उपोषण; एका महिन्यात काय घडलं? title=

धाराशिवमध्ये अध्यात्मिकतेचे शिक्षण घेणाऱ्या 14 वर्षीय प्रेम शिंदे या विद्यार्थ्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. मुलाच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर धाराशिव तालुक्यात खळबळ माजली होती. दरम्यान ही आत्महत्या नसून शिक्षकांनी केलेल्या मारहाणीला कंटाळून त्याने जीव संपवल्याचा आरोप आहे. दरम्यान प्रेम शिंदेला न्याय मिळावा यासाठी त्याचे वडील लहू शिंदे यांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे. 

प्रेम शिंदेच्या मारेकऱ्यांना कलम 302  लावून तात्काळ अटक करावी, वानेवाडी येथील संत नारायण बाबा रामजी बाबा अध्यात्मिक संस्थेची आश्रमशाळा अनधिकृत असल्याने ती बंद करावी, या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे द्यावा, आरोपींना सहकार्य करणाऱ्या अन्य लोकांविरुद्ध कडक कारवाई करावी अशा मागण्या प्रेम शिंदेचं वडील लहू शिंदे यांनी केल्या आहेत. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारपासून (28 ऑक्टोबर) आमरण उपोषण सुरू केलं आहे .

वाखरवाडी येथील लहू शिंदे यांचा मुलगा प्रेम शिंदे हा वानेवाडी येथील काका उंबरे यांच्या आश्रमशाळेत अध्यात्मिक शिक्षण घेत होता. तसंच संत ढोराळा येथील संत गोरोबा काका शाळेत दहावीत शिकत होता. त्याचा 4 ते 5 ऑगस्ट दरम्यान वानेवाडी येथे संशयास्पद मृत्यू झाला असून, याप्रकरणी ढोकी पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा हा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. 

प्रेम शिंदे याच्या अंगावर मारहाण झाल्याच्या 25 ते 30 जखमा आहेत. आश्रमातील महाराजांनी बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. मराठा समाजातील एका गरीब विद्यार्थ्यांचा बळी घेणाऱ्या आरोपीविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी सातत्याने होत आहे.

प्रेम शिंदेच्या मृत्यूनंतर संस्था चालकासह इतर 3 व्यक्तींविरोधात ढोकी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाणेवाडी येथील श्री संत नारायण बाबा रामजी बाबा अध्यात्मिक संस्थेत तो संप्रदायिक शिक्षण घेत होता. येथे शिकवणाऱ्या महाराजांच्या सततच्या मारहाणीला कंटाळून त्याने गळफास घेतल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रेम शिंदे याच्या संशयास्पद मृत्यूची सीआयडीमार्फत चौकशी करा, अशी मागणी करताना ग्रामस्थांनी चूल बंद आंदोलन पुकारलं होतं.