'...तेव्हाच मविआने कारवाई का केली नाही'? देशमुखांच्या आरोपांवर फडणवीसांचा सवाल

देवेंद्र फडणवीस हे सचिन वाझेला हाताशी धरुन आपल्यावर आरोप करत आहेत. असा आरोप अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला होता. त्यालाच उत्तर देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सवाल उपस्थित केला आहे. 

Soneshvar Patil & Updated: Aug 4, 2024, 06:24 PM IST
'...तेव्हाच मविआने कारवाई का केली नाही'? देशमुखांच्या आरोपांवर फडणवीसांचा सवाल title=

Devendra Fadnavis : चांदीवाल आयोगाचा अहवाल महाविकास आघाडीच्या कार्यकाळात आला. त्यावेळी राज्य सरकार तर त्यांचं होतं. यांचा कोणताही संबंध आलेला नाही. ज्यावेळी ते कोर्टात गेले त्यावेळी कोर्टाने दिलेले निर्णय जर तुम्ही पाहिले तर सर्व गोष्टी स्पष्ट होतील. मुळातच मी याच्यावर वारंवार बोलत नाही की, जर रोज कोणीतरी काही तरी बोलत असेल तर त्याला उत्तर देऊन त्यांच्या स्तरावर जाण्याची मला इच्छा नाही. पण शेवटी सत्य जे आहे आहे ते समोर येणार आहे. 

मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो. महाविकास आघाडीच्या काळातच चांदीवाल आयोगाचा अहवाल आला आहे. मग तेव्हा त्यांचेच सरकार होते. मग का कारवाई त्यांनी केली नाही. परमबीर सिंह यांची नियुक्ती महाविकास आघाडी सरकारनेच केली. अनिल देशमुख गृहमंत्री असतानाच परमबीर सिंह यांनी आरोप केले होते. 

अनिल देशमुख यांच्या ट्विटमध्ये काय? 

धन्यवाद देवेंद्र फडणवीसजी! महाराष्ट्रात तुम्ही किती घाणेरडे व खालच्या थराचे राजकारण करत आहात, याचा नवीन अंक आज नागपूरच्या जनतेला पुन्हा एकदा तुमच्या कडून पाहायला मिळाला. लक्षात असू द्या... जनता जनार्दन हैं! फोटो ट्विट करत अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 

सचिन वाझे यांचे गंभीर आरोप

अँटिलिया बॉम्ब प्रकरण तसेच मनसुख हिरेन खून प्रकरणात सचिन वाझे हे गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहेत. त्यांना रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे.  सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, याचे सर्व पुरावे सीबीआयकडे आहेत. असा गंभीर आरोप सचिन वाझे यांनी शनिवारी केला आहे.