'सरकारवर आरोप करून पवारांचा सहानभूती मिळविण्याचा प्रयत्न'

  हे प्रवेश का सुरू आहेत ? याचा तुम्ही विचार करा..असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. 

Updated: Jul 28, 2019, 01:33 PM IST
'सरकारवर आरोप करून पवारांचा सहानभूती मिळविण्याचा प्रयत्न' title=

कोल्हापूर : भाजपा सरकारकडून ईडी, सीबीआय यांचा गैरवापर लोकप्रतिनिधींना धमकावण्यासाठी केला जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. या टीकेला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी उत्तर दिले आहे. सरकारवर आरोप करून पवारांकडून सहानभूती मिळविण्याचा प्रयत्न केला जातोय.  हे प्रवेश का सुरू आहेत ? याचा तुम्ही विचार करा..असा प्रतिटोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत आज कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते भाजापात प्रवेश करत आहेत. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात हा प्रवेशाचा कार्यक्रम होत आहे.चंदगडचे माजी आमदार भरमुआण्णा पाटील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश होतोय.

बारामती लढवायला तुम्हाला मुलगीच लागते. मावळ लढवायला पार्थ लागतो; तुम्ही महाराष्ट्रात वर्षानुवर्षे घराणेशाही सुरू केली.कुणालाच पुढं येवू द्यायची नाही..ही तुमची परंपरा असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर केली. 

लोकांना पार्याय न्हवते म्हणून ते तुम्हच्याकडे राहिले. तुम्ही सर्वसामान्य लोकांना बँकेत खाते उघडू दिले नाही. तर 50 हजार कोटी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकले. हे आधी होत न्हवते; पण आत्ता होतंय असेही पाटील म्हणाले.  31 तारखेला मुंबईमध्ये मोठे बॉम्ब फुटणार आहेत. दर दहा दिवसांनी हे बॉम्ब फुटत राहणार 2024 नंतर कोणतीच कामे अपूर्ण राहणार नाही असेही ते म्हणाले.

महत्त्वाचे मुद्दे 

नवीन येणाऱ्या माणसांमुळे जुन्या माणसांनी घाबरायचे काम नाही
नव्या माणसांना सन्मानाने काम मिळेल. 
एक तीळ वाटून खा. अशी मला आणि मुख्यमंत्री यांना सवय आहे. 
भारतीय जनता पार्टी करण्यासाठी सर्वानी काम करा. 
आगामी काळात एकत्रित निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करूयात.
मजबूत सरकार आणूया...मजबूर सरकार नको