सत्ता नसल्याने लोक अस्वस्थ, धार्मिक भावना भडकवून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न - पवार

  Sharad Pawar on Loudspeaker row : महाराष्ट्रात असे वातावरण कधीच नव्हते. सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ झालेत, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेत्यांवर केली आहे.  

Updated: Apr 25, 2022, 01:30 PM IST
सत्ता नसल्याने लोक अस्वस्थ, धार्मिक भावना भडकवून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न - पवार title=
संग्रहित छाया

पुणे :   Sharad Pawar on Loudspeaker row : महाराष्ट्रात असे वातावरण कधीच नव्हते. सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. हे लोक मुख्यमंत्र्यांचा एकरी उल्लेख करतात. तसेत ते शिवीगाळ करतात, हे योग्य नाही. निवडणुका होण्यापूर्वीच मी येणार, मी येणारच्या घोषणा त्यांनी दिल्या होत्या. आता सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ झालेत, असा जोरदार टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे. भोंगे आंदोलनावर राज्यात परिस्थिती निर्माण झाल्यावर पवार यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे.

सत्ता येते आणि जाते त्यामुळे आपण इतकं अस्वस्थ होण्याची गरज नाही, असा सल्ला भाजप नेत्यांना पवार यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्रीपद ही एक संस्था आहे. अपशब्द वापरणे योग्य नाही. धार्मिक श्रद्धा प्रत्येकाने स्वतःपुरती ठेवावी. धार्मिक भावना भडकवून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले. धार्मिक भावना स्वतःपुरत्या मर्यादित ठेवा, असे शरद पवार यांनी सुनावले आहे. मुख्यमंत्री ही एक संस्था आहे, मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणे अयोग्य आहे, अशा कानपिचक्या पवार यांनी विरोधकांना दिल्या. सत्ता गेली की काही जण अस्वस्थ होतात, असा टोला त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपला मारला.

काही धार्मिक कार्यक्रम करायचे असतील तर ते घरात करावे. दुसऱ्या च्या घरासमोर हे जाऊन करायचा आग्रह धरु नये. हल्ली वातावरण बिघडलं आहे. मुख्यमंत्री एक व्यक्ती नव्हे तर संस्था असते तिचा यथोचित सन्मान राखण पाहिजे. त्यांचा एकेरी उल्लेख करु नये, असे ते म्हणाले. राष्ट्रपती राजवटीबाबत पवार म्हणाले, या चर्चा केल्या जातात पण याचा काही फायदा होत नाही. जेव्हा निवडणुका होतील तेव्हा काय होते हे कोल्हापूरच्या निवडणुकीने दाखवून दिले आहे. सरकार गेल्यावर लोकं अस्वस्थ होतात. मी पुन्हा येतो म्हणत असताना सत्ता गेली, असा टोला भाजपला लगावला. 

किरीट सोमय्या हे गृह सचिवांना भेटायला गेले याचा अर्थ हाच की सत्ता गेल्यावर अस्वस्थ झाले आहेत. माझी सत्ता गेल्यावर मी रात्री 12.30 नंतर घर सोडले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता वानखेडे स्टेडियमवर मॅच पाहायला गेलो. सत्ता येते जाते पण अस्वस्थ होण्याची गरज नाही. जेव्हा निवडणुका होतील तेव्हा जे आहे ते समोर येईल, असे ते म्हणाले.