एसटीने प्रवास करण्यासाठी ई पासची गरज नाही

५ महिने एसटीची आंतरजिल्हा सेवा बंद होती

Updated: Aug 19, 2020, 08:11 PM IST
एसटीने प्रवास करण्यासाठी ई पासची गरज नाही  title=

 मुंबई : मागील ५ महिने एसटीची आंतरजिल्हा सेवा बंद होती.  ती उद्या २० ऑगस्टपासून सुरू होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात हा निर्णय घेतला असून एसटीची आंतरजिल्हा सेवा सुरू केली जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. गणेशोत्सव काळात लोकांना एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी हा निर्णय घेतला. एसटीने एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी कुठल्याही ई पासची गरज लागणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

 काही नियम पाळून प्रवास करता येईल, एका एसटीत २२ जण प्रवास करू शकतील. त्यामुळे प्रवाशांनी याची काळजी घ्यावी.  जशी मागणी येईल तशा बसेस वाढवल्या जातील.  एसटीचे दर पूर्वीप्रमाणे राहतील त्यात कोणतेही बदल होणार नाहीत ही महत्वाची माहिती देखील अनिल परब यांनी यावेळी दिली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  टाळेबंदीमुळे गेली ५ महिने एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा उद्या दि. २० ऑगस्ट 2020 पासून सुरू होणार आहे.
 त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल. अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
श्री. परब म्हणाले, उद्यापासून एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी यासर्व प्रकारच्या बस सेवा (मूळ तिकीट दरात) टप्याटप्याने सुरु होत असून त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. एसटीच्या प्रवासासाठी ई -पासची आवश्यकता नाही. 
 
 प्रवासात प्रवाशांनी  कोविड - १९ च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.    दि.२३ मार्चपासून कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटीने परप्रांतीय मजुरांची वाहतूक, कोटा येथून महाराष्ट्रीयन विध्यार्थाना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविणे, कोल्हापूर - सांगली येथील ऊसतोड मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडणे, अशा प्रकारे समाजातील सर्व घटकांना  सुरक्षित दळणवळण सेवा पुरविली आहे. 
 
दि.२२ मे  पासून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु करण्यात आली  आहे. त्याद्वारे दररोज सुमारे १३०० बसेसमधून सरासरी ७२८७ फेऱ्यातून अंदाजे दीड लाख प्रवाशांना  सुरक्षित प्रवाशी सेवा एसटीने पुरविली आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या आंतरजिल्हा बससेवेचा कोविड - १९ च्या काळातील शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.परब यांनी यावेळी केले.