पत्नी माहेरी गेल्याचा राग; पतीने सासू आणि मेव्हण्याला जिवंत जाळत स्वतःलाही संपवले

Amravati Crime : अमरावतीमध्ये जावयाने सासू आणि मेव्हण्याची जिवंत जाळून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. दोघांच्या हत्येनंतर आरोपी जावयाने स्वतःलाही संपवलं आहे. या घटनेनंतर अमरावतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 26, 2023, 10:23 AM IST
पत्नी माहेरी गेल्याचा राग; पतीने सासू आणि मेव्हण्याला जिवंत जाळत स्वतःलाही संपवले title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : जावयाने सासू आणि मेव्हण्याला जिवंत पेटवून हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावतीमध्ये (Amravati Crime) घडली आहे. यानंतर आरोपी जावयाने स्वतःलाही पेटवून घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे. माहेरी गेलेल्या पत्नीला परत पाठवत नसल्याने जावयाने हे धक्कादायत कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Amravati Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.

अमरावतीमध्ये जावयाने सासू आणि मेव्हण्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना वरुड तालुक्यातील वंडली येथे घडली आहे. सासू आणि मेव्हण्याचा खून केल्यानंतर जावयाने स्वत:लाही पेटवून घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा सगळा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. आरोपी आशिष ठाकरे (वय 25 वर्षे) असे जावयाचे नाव आहे. तर सासू लता सुरेशराव भोंडे (वय 45 वर्ष) आणि मेव्हणा प्रणय सुरेशराव भोंडे (वय 20 वर्षे) अशी जळून खाक झालेल्यांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिषचा लता भोंडे यांच्या मुलीशी काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांच्यातील प्रेमसंबंध धोंडे कुटुंबीयांना मान्य नव्हते. मात्र कालांतराने या दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले. त्यांच्यामधील वाद विकोपाला गेला आणि मुलगी पुन्हा तिच्या आईकडे राहण्यासाठी आली. आशिष पत्नीला घ्यायला लता भोंडे यांच्या घरी गेला होता. मात्र लता भोंडे आणि त्यांच्या मुलाने मुलीला आशिषसोबत पाठवण्यास नकार दिला. त्यांच्यात जोरदार भांडण देखील झाले होते. त्यानंतर रविवारी पत्नी घरी नसताना आशिष सासूच्या घरी गेला. त्यानंतर त्याने सासू आणि मेव्हण्याला जिवंत जाळले. त्यानंतर त्याने स्वत:लाही संपवून घेतले.

तीन वर्षांपासून सुरू असलेल्या दोघांच्या प्रेमाचे रूपांतर मार्च महिन्यात विवाहात झाले होते. धमक्या देऊन विवाह केल्याने सहा महिन्यातच दोघांचा काडीमोड देखील झाला होता. या प्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रारी झाल्या. पण सहा महिने पूर्ण होण्याच्या एक दिवसांपूर्वीच आशिषने सासू आणि मेव्हण्याला पेट्रोल टाकून जिवंत मारले. त्यानंतर आशिषनेही आत्महत्या केली आहे.

दोघांच्या प्रेमविवाहाला मुलींच्या आई वडीलांचा आणि भावाचा प्रचंड विरोध होता. त्यातून पत्नी माहेरी निघून गेल्याने आशिषला प्रचंड राग होता. त्याच भांडणातून आशिषने गाढ झोपी गेलेल्या सासू आणि मेव्हण्याचा अंगावर पेट्रोल टाकून दोघांना जिवंत जाळले आहे. दोघांची राख झाल्यावर स्वतःवर पेट्रोल टाकून आत्महत्या केली आहे.

कशी केली हत्या?

पत्नी माहेरी आल्यानंतर आशिष वंडलीत येऊन त्रास देत होता. त्यामुळे लता भोंडे यांनी मुलीला मावशीकडे पाठवले. रविवारी आशिष मित्राच्या दुचाकीने वंडलीला आला होता. वाटेत गाडीत पेट्रोल भरताना त्याने काचेच्या बाटलीत शंभर रुपयांचे पेट्रोल विकत घेतले होते. सासूरवाडीला आल्यानंतर त्याने लता आणि प्रणयसोबत वाद घालण्यास सुरुवात केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर सोमवारी पहाटे तो परत आला. लता आणि प्रणयच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यानंतर आपणही आत्महत्या करत असल्याचे सांगत पेट्रोल स्वतःवर ओतून पेटवून घेत आत्महत्या केली.