आपल्याच मित्रपक्षाच्या नेत्यांवर अमोल मिटकरी यांची जहरी टीका; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर हल्लाबोल

आमदार अमोल मिटकरींनी अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप केलाय. 6 महिन्यांपासून पालकमंत्री अकोल्यात फिरकले नसल्याचा आरोप मिटकरींनी केलाय. त्यामुळे महायुतीत सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. पाहुयात, याविषयीचा एक रिपोर्ट.

वनिता कांबळे | Updated: Jul 23, 2024, 10:56 PM IST
आपल्याच मित्रपक्षाच्या नेत्यांवर अमोल मिटकरी यांची जहरी टीका; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर हल्लाबोल title=

Amol Mitkari on Vikhe Patil: अमोल मिटकरी...राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि दादांचे शिलेदार.. आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे मिटकरी कायम चर्चेत असतात. आता तर मिटकरींनी अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवरच तोफ डागलीय. गेल्या 6 महिन्यांपासून विखे पाटील अकोल्यात फिरकले नसल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केलाय. जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य परिस्थिती असताना पालकमंत्री कुठे गेले, असा सवालही मिटकरींनी केलाय. 
भाजप नेते प्रवीण दरेकरांनी यावरून अमोल मिटकरींवर हल्लाबोल केलाय. मिटकरींनी तोंडाला लगाम घालण्याची गरज असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय.

आपल्याच मित्रपक्षाच्या नेत्यांवर अमोल मिटकरींनी टीका केल्यानं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावरून यापूर्वीही अनेकदा वाद रंगलेला आहे. महायुतीत अजितदादांचं खच्चीकरण होत असल्याचा आरोप मिटकरींनी केला होता.  भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांवरही मिटकरींनी सडकून टीका केली होती. महायुतीसोबत सत्तेत सहभागी असतानाही मिटकरी युतीमधल्याच नेत्यांना आणि मंत्र्यांना टार्गेट करताना दिसतायत.. 

राधाकृष्ण विखे पाटील समस्येकडे दुर्लक्ष करताय..तसेच सहा महिन्यांपासून अकोल्यात फिरकलेच नसल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केलाय...जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस, पोलीस भरती अश्या अनेक समस्या निर्माण झाल्या असून देखील,  विखे पाटील या समस्येकडे दुर्लक्ष करताय, असं अमोल मिटकरींनी म्हटलंय. तर अशा बाबी चर्चेतून सुटू शकतात...ट्विट करण्याची गरज नव्हती असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी अमोल मिटकरींना दिलाय...