नवाब मलिक यांची धाकधुक वाढली, जामीनाची मुदत संपत आली तरी अजित पवार गटाकडुन हिरवा कंदिल मिळेना

नवाब मलिकांना तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. जामीन वाढवण्यासाठी सुप्रीम कोर्टात जावं असे  हायकोर्टाने निर्देश आहेत. 

Updated: Jan 3, 2024, 06:46 PM IST
नवाब मलिक यांची धाकधुक वाढली, जामीनाची मुदत संपत आली तरी अजित पवार गटाकडुन हिरवा कंदिल मिळेना title=

Nawab Malik : नवाब मलिकांना दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. जामीन अर्जाची मुदत वाढवण्यासाठी मलिकांनी सुप्रीम कोर्टात जावं असे निर्देश हायकोर्टानं मलिकांना दिले आहेत. वैद्यकीय कारणांसाठी नवाब मलिक सध्या जामीनावर आहेत. 11 जानेवारीला त्यांच्या जामीनाची मुदत संपत असल्यानं त्यांनी जामीन वाढवण्यासाठी पुन्हा हायकोर्टात अर्ज केला होता. मात्,र हायकोर्टानं त्यांच्या याचिकेवरील सुनावणी 15 जानेवरीपर्यंत तहकूब केलीये.. तोपर्यंत मलिकांना सुप्रीम कोर्टात दाद मागता येणार आहे.

मलिकांना महायुतीत घेण्याबाबत अद्याप अजित पवारांनी हिरवा कंदील नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी आमदार नवाब मलिक यांची काही दिवसांपूर्वी देवगिरी बंगल्यावर गुप्त बैठक झाली होती. तब्बल तासभर ही बैठक सुरू होती. मलिकांना महायुतीत घेण्याबाबत अद्याप अजित पवारांनी हिरवा कंदील दाखवला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  नवाब मलिक यांना महायुतीत सामावून घेण्यावरून हिवाळी अधिवेशनात प्रचंड वाद निर्माण झाला होता. मलिक महायुतीत नकोत, अशी भूमिका भाजपनं घेतली आहे.

नवाब मलिक यांच्यावरून महायुतीत महाभारत 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्यावरून महायुतीत मतभेद आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून मलिकांचा सत्तेत समावेशाला उघड विरोध केला होता. महायुतीत नवाब मलिकांना घेणं योग्य होणार नाही अशी भूमिका फडणवीसांनी पत्रातून मांडली होती. मलिकांवर देशद्रोहाचे आरोप आहेत. सत्ता येत आणि जाते. मात्र देश महत्त्वाचा आहे असं फडणवीसांनी नमूद केले होते.

मलिक थेट सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नबाव मलिक यांनी हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली. मात्र, कामकाज सुरु झाल्यानंतर मलिक थेट सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले. तेव्हापासूनच महायुतीत राजकीय चर्चांना उधाण आले. मलिकांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचीच चर्चा आहे. जामिनावर सुटल्यानंतर नवाब मलिक कोणत्या गटात जाणार यावर चर्चा सुरु होती. मात्र, अधिवेशनासाठी दाखल झाल्यावर मलिकांनी आधी अजित पवार गटाच्या कार्यालयात भेट दिली. त्यानंतर मग शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुखांची गळाभेट घेतली होती. 

नवाब मलिक आणि प्रफुल्ल पटेलांच्या मुद्द्यावरून संजय राऊतांची भाजपवर टीका

नवाब मलिक आणि प्रफुल्ल पटेलांच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी भाजपला सवाल केला होता. नवाब मलिकांबद्दल भूमिका घेतली मग प्रफुल्ल पटेलांबद्दल का नाही? असा प्रश्न विचारत राऊतांनी भाजपवर टीका केली होती.