Maharastra Politics: अहमदनगरचं नामांतर अन् फडणवीसांनी संधी साधली, भाजपचं हिंदुत्व की नवं 'माधव'त्व?

Maharastra BJP OBC Politics: भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचे मार्गदर्शक राहिलेल्या वसंतराव भागवतांकडे या कल्पनेचे जनकत्व जाते. एकीकडे आपली कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा बळकट करून घेतानाच, भाजपनं धनगर समाजातही संदेश दिलाय.

Updated: Jun 2, 2023, 08:39 PM IST
Maharastra Politics: अहमदनगरचं नामांतर अन् फडणवीसांनी संधी साधली, भाजपचं हिंदुत्व की नवं 'माधव'त्व? title=
bjp obc maharastra

BJP Action Plan For OBCs In Maharastra: अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी नगर केलं जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा आणि त्याचा मिळालेला प्रतिसाद भाजपला नक्कीच सुखावणारा असेल. कारण, या घोषणेमुळे भाजपनं एकाच वेळी दोन लक्ष्य साधली आहेत. आधी औरंगाबाद, उस्मानाबाद आणि त्याच ओळीत नगरचं नामांतर हे एक प्रकारे भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाचा अविष्कार आहे. त्यामुळे एकीकडे आपली कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा बळकट करून घेतानाच, भाजपनं धनगर समाजातही संदेश दिलाय आणि म्हणूनच गेल्या 4 दशकांपासून भाजपचा महाराष्ट्रात सुरू असलेला 'माधव' प्रयोग आता नवं वळण घेताना दिसतोय.

मा..ध..व... अर्थात माळी, धनगर, वंजारी आणि तत्सम ओबीसी समूहांना जोडण्याचं भाजपचं अभियान. भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचे मार्गदर्शक राहिलेल्या वसंतराव भागवतांकडे या कल्पनेचे जनकत्व जाते. महाराष्ट्रात स्वातंत्र्योत्तर आणि महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरही प्रामुख्याने मराठा केंद्री राजकारण झाले. या समाजातून आलेले अनेक नेतेही नेतृत्व म्हणून त्यांना लाभले. अशात आधी जनसंघ आणि नंतर भाजपची स्पेस वाढणं अवघड होतं. यातूनच उदय झाला या मा..ध..व.. समीकरणाचा. 

मराठा समाजाहून अधिक लोकसंख्या असलेला, हिंदू बहुल आणि स्वत:च्या राजकीय स्पेसच्या, नेतृत्वाच्या शोधात असलेला हा होता ओबीसी समाज. त्यातही पुढारलेल्या आणि संख्येनं शक्तिशाली असलेले माळी, धनगर, वंजारी हे या ओबीसी वर्गाचे प्रमुख प्रतिनिधी. म्हणूनच, ७० ते ९० च्या दशकादरम्यान संघ-भाजपातून गोपीनाथ मुंडे, पांडुरंग फुंडकर, एकनाथ खडसे, माधवराव शिवणकर, भिकूजी इदाते ते आता सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, राम शिंदे, गोपीचंद पडळकर यांच्यापर्यंत अनेक ओबीसी नेते पुढे आले. 

आणखी वाचा - मुंडे भगिनी भाजपमध्ये नाराज? पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

दरम्यान, गेल्या दोन वर्षात राजकीय संदर्भ बदलतायत. शरद पवारांनी २०१९ ला विधानसभेत मिळवलेलं यश, शिवसेना फुटल्यानंतर आता उद्धव यांना मिळू लागलेली सहानुभूती, कर्नाटक विजयानंतर काँग्रेसचा वाढलेला आत्मविश्वास, खडसेंनी भाजप सोडणं, पंकजांची वेळोवेळी जाहीर होणारी नाराजी आणि भाजपातही तयार झालेले प्रस्थापित यामुळे भाजपलाही नवं नॅरेटिव्ह देण्याची गरज होतीच. त्यामुळे अहमदनगरच्या नामांतराच्या निमित्तानं भाजपनं पुन्हा माधवची मोट बांधण्याची रणनीती आखल्याचं दिसतंय.