2 तासांचा प्रवास 20 मिनिटांत; सुपरफास्ट अटल सेतूने रचला नवा रेकॉर्ड

अटल सेतूमुळे दक्षिण मुंबई ते पनवेल, पुणे व नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासाच्या वेळात किमान अर्ध्या तासाची बचत होत आहे. बेस्ट, एनएमएमटी बसेस, तसेच एमएसआरटीसीच्या शिवनेरी बस, तसेच इतर खासगी व व्यावसायिक वाहने अटल सेतूचा नियमित वापर करतात. 

वनिता कांबळे | Updated: Aug 26, 2024, 07:18 PM IST
2 तासांचा प्रवास 20 मिनिटांत; सुपरफास्ट अटल सेतूने रचला नवा रेकॉर्ड   title=

Atal Setu :  मुंबई आणि नवी मुंबईला जोडणा-या अटल सागरी सेतूमुळे प्रवास अधिक जलद आणि सुखद झाला आहे. अचल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई हा दोन तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत पूर्ण होत आहे.   अटल सेतूने नवा रेकॉर्ड नोंदवला आहे. सात महिन्यांत तब्बल 50 लाख वाहनांनी  अटल सेतूवरून प्रवास केला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2024 रोजी अटल सेतूचे लोकार्पण करण्यात आले. 13 जानेवारी रोजी हा सेतू वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा सेतू भारतातील सर्वाधिक लांबीचा आहे आणि पाण्यावरील सर्वाधिक लांबीचा सेतू म्हणून ओळखला जातो. अटल सेतूच्या लोकार्पणाने मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत एक नवा आयाम जोडला गेला आहे. या सेतूचा वापर सर्व प्रकारच्या वाहनांकडून केला जातो. 13 जानेवारी 2024 ते 25 ऑगस्ट 2024 या सात महिन्यांच्या कालावधीत या सेतूवरून 50 हजार पेक्षा जास्त वाहनांनी प्रवास केला आहे. अटल सेतू दक्षिण मुंबईला नवी मुंबई, पनवेल, आणि पुणे या शहरांशी अधिक वेगाने जोडतो. त्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होतो आणि वाहतुकीची सुसूत्रता वाढते.

दरम्यान, वरळी-शिवडी उन्नत मार्गाचे काम सुमारे 75% पूर्ण झाले असून, हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर वरळी सी-फेसवरून अटल सेतूवर 5 ते 10 मिनिटांत पोहोचता येईल. शिवाय, चिरले इंटरचेंजपासून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गादरम्यान उन्नत मार्गाचे कामही हाती घेण्यात आले आहे. या सर्व प्रकल्पांच्या पूर्ततेनंतर, दक्षिण मुंबई आणि मुंबईच्या पश्चिम उपनगरे ते नवी मुंबई, पनवेल, पुणे आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक अधिक गतिमान होईल.

अटल सेतूच्या उद्घाटनामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या विमानतळांदरम्यानचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे. हा सेतू दक्षिण मुंबईला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यामधील प्रवासासाठी लागणारा वेळ लक्षणीय कमी होणार आहे.

या नव्या सेतूमुळे दक्षिण मुंबईतील प्रवाशांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी आता पूर्वीपेक्षा कमी वेळ लागणार आहे. अटल सेतूचा वापर केल्याने मुंबईच्या दोन्ही विमानतळांमधील वाहतूक सुलभ होईल आणि प्रवाशांच्या वेळेची बचत होईल. यामुळे विमानतळांमधील कनेक्टिव्हिटी सुधारली जाईल. याचा फायदा केवळ व्यावसायिक प्रवाशांना नव्हे, तर सर्वसामान्य प्रवाशांनाही होईल.

अटल सेतूमुळे सुलभ झालेल्या प्रवासाबद्दल प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अटल सेतूच्या माध्यमातून मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतुकीत एक मोठा बदल घडला आहे आणि लाखो लोकांनी याचा उपयोग केला आहे. केवळ सात महिन्यांच्या कालावधीत अटल सेतूवरून तब्बल ५० लाख वाहने धावली, यावरून या पुलाचे महत्त्व आणि उपयुक्तता दिसून येते. या सेतूमुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि जलद प्रवासाची सुविधा मिळत आहे. या प्रकल्पामुळे मुंबईच्या वाढत्या वाहतुकीवरही प्रभावी तोडगा म्हणून याचा उपयोग होत आहे आणि लाखो नागरिकांना याचा लाभ होत आहे."

एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे म्हणाले: अटल सेतूच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा झाली आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांना जलदगतीने आणि सुरक्षितपणे प्रवास करता येत आहे. हा प्रकल्प भविष्यातील अनेक उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. तंत्रज्ञान, नियोजन आणि प्रबळ इच्छाशक्ती एकत्र आल्याने व्यापक सामाजिक बदल कशा प्रकारे घडून येऊ शकतो, याचे अटल सेतू हे एक उत्तम उदाहरण आहे."