छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; आमदाराने कार्यालय फोडले

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. यामुळे ठाकरे गटाचे आमदार आक्रमक झाले आहे.   

वनिता कांबळे | Updated: Aug 26, 2024, 05:26 PM IST
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; आमदाराने कार्यालय फोडले title=

Sindhudurg Rajkot Fort Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. या प्रकारामुळे शिवभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. तर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार या घटनेमुळे चांगलेच संतापले आहेत. संतप्त आमदाराने PWD चे कार्यालय फोडले आहे.  

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. विशेष म्हणजे नौदल दिननिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023ला मालवणमध्ये येऊन या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं. 

मालवण राजकोट पुतळा घटनेनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. पुतळ्याची देखभाल आणि निगा राखण्याची जबाबदारी  सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही घटना घडल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनीकेला आहे. 

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी देखील सरकारवर निशाणा साधला आहे.  हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. महाराजांचा पुतळा बसवाताना सरकारने काळजी घेतली नाही.  पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करून घेणे हेच त्यांचे ध्येय होते.   हे इव्हेंट सरकार आहे.  महाराजांच्या पुतळ्याबाबत देखील यांनी घोटाळा केला असणार.  केवळ महाराजांचे नाव वापरायचे, त्यांच्या बाबतीत काळाची घेण्यात आलेली नाही. याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे. महाराजांवर श्रद्धा असणारा  समाज यामुळे नाराज झाला आहे. 

खासदार अमोल कोल्हे यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गात उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळणे अतिशय गंभीर आहे. असे नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची व संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणजे शिवभक्तांना ऊर्जा देणारे "शक्तीस्थळ" असते, हे स्मारक उभारताना किमान पुढील एका शतकाचा विचार करणे आवश्यक असते. मात्र, केवळ विशिष्ट व्यक्तीच्याच हातून अनावरण करण्यासाठी त्यांच्या सोयीनुसार स्मारकांचे काम घाईघाईत उरकण्याची दुर्दैवी प्रथा सध्या देशात प्रचलित होत आहे. 

सिंधुदुर्ग येथील भंग पावलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानाने उभारण्यात यावा, यावेळी कोणाच्याही स्वार्थासाठी कामाच्या दर्जासोबत कसलीही तडजोड करू नये ही माझ्यासह तमाम शिवभक्तांची इच्छा आहे.
घडलेली घटना दुर्दैवी असली तरी  शिवभक्तांनी शांतता राखावी, कायदा व सुव्यवस्था भंग होऊन छत्रपती शिवरायांच्या विचारांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी असे माझे आवाहन आहे.