हाहाकार! दिल्लीत यमुना नदीने गाठली धोक्याची पातळी, हिमाचलमध्ये पूर... मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

देशात उत्तररेकडच्या अनेक राज्यांमध्ये पावासाने हाहाकार माजवला आहे. राजधानी दिल्लीत जनजीवन विस्कळीत झालं आहे, तर हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये नद्यांना पुर आलेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून नदी किनारच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येतंय.

राजीव कासले | Updated: Jul 10, 2023, 08:38 PM IST
हाहाकार! दिल्लीत यमुना नदीने गाठली धोक्याची पातळी, हिमाचलमध्ये पूर... मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत title=

Weather Alert : देशभरातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाने (Raifall) हाहाकार माजवला असून जनजीवन पूरतं विस्कळीत झालं आहे. अनेक पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सखल भागात पाणी साचल्याने लोकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) पावसाने थैमान घातलंय. त्यातच हरियाणातल्या (Hariyana) हाथिनी कुंडातून सोडण्या आलेल्या पाण्यामुळे दिल्लीतल्या यमुना नदीने (Yamuna River) धोक्याची पातळी गाठली आहे. संध्याकाळी पाच वाजता यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे राजधानीत अलर्ट देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशातही नद्यां भरून वाहातायत. 

नवी दिल्लीत अलर्ट
मुसळधार पावसाने यमुना नदी 11 जुलैला धोक्याची पातळी गाठेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण एक दिवस आधीच म्हणजे 10 तारखेला संध्याकाळी पाच वाजताच यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली. यमुना नदीच्या किनारी राहाणाऱअया लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येतंय. संध्याकाळपर्यंत यमुनाची पाणी पातळी 205.40 मीटर नोंदवण्यात आली आहे. 

सीडब्ल्यूसीच्या माहितीनुसार यमुना नदीची पाणी पातळी जेव्हा 205.33 मीटरच्या वर जाते, तेव्हा धोक्याचा इशारा दिला जातो. हाथिनी कुंडातून सातत्याने पाणी सोडलं जात आहे. आता पर्यंत हाथिनी कुंडातून 2 लाख 18 हजार 351 क्यूसेक पाणी सोडण्यात आलं आहे. यमुना नदीतील पाणी पातळी वाढल्याने दिल्लीतल्या सखल भागात राहाणाऱ्या लोकांना पुराचा धोका असल्याची भीती वर्तवली जातेय. त्यामुळे सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे. याआधी 1978 आणि 2010 मध्ये दिल्लीत पुर आला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जिवीत हानी झाली होती. 

हिमाचलमध्ये नदीला पूर
हिमाचल प्रदेशमधल्या (Himachal Pradesh) व्यास आणि पारबती नदीला पूर आलाय. कुल्लू पोलिसांनी नदी किनारी न जाण्याचा इशारा नागरिकांना दिला आहे. तसंच लोकांना घरातच राहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिमलापासून 50 किलोमीटर दूर असलेल्या सुन्नीमध्ये सतलज नदी धोक्याच्या पातळीवर वाहतेय. 

हिमाचलमध्ये अस्मानी संकट 
शिमला जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडतोय. ज्यामुळे भूस्खलन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शिमलाच्या हाटकोटी राष्ट्रीय राजमार्गावर कोकूनाला पुलाचा एक भाग तुटला, ज्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. आता पूलच कोसळण्याची भीती  निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनांसाठी हा पूल बंद करण्यात आला आहे. हिमाचल सरकारमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारतात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. ज्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये मोठं नुकसान झालं आहे. रस्त्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटाना घडल्या असून ढीगारा हटवण्यासाठी राज्यभरात जवळपास 342 मशीन्स तैनात करण्यात आल्यात. कुल्लू-मनालीत अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढलं जात आहे. 

चमोली आणि चंदीगडमध्ये शाळा बंद
हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा रुद्रवतार पाहता चमोलीत पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा बुधवारी 12 तारखेपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. पंजाबमधल्या चंदीगडमध्येही पावसामुळे 13 जुलैपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.