Bhagwant Mann | कॉमेडियन ते मुख्यमंत्री - असा आहे भगवंत मान यांचा प्रवास

पंजाबच्या राजकारणात मोठा बदल झालाय. भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली आप सरकार स्थापन करणार आहे. ( Bhagwant Mann New CM of Punjab)

Updated: Mar 10, 2022, 06:10 PM IST
Bhagwant Mann | कॉमेडियन ते मुख्यमंत्री - असा आहे भगवंत मान यांचा प्रवास title=

मुंबई : पंजाबच्या राजकारणात मोठा बदल झालाय. भाजप आणि काँग्रेसपासून अंतर राखत यावेळी जनतेने दिल्लीतील केजरीवाल मॉडेलवर शिक्कामोर्तब केलाय. त्यामुळे आता भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली आप सरकार स्थापन करणार आहे. राज्यातील 117 पैकी 91 जागांवर 'आप'च्या उमेदवारांनी विजय मिळवलाय, तर 70 जागांवर भक्कम आघाडी कायम ठेवली आहे. कॉमेडी करता करता भगवंत मान मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत कसे पोहोचले ते पाहूया. (Punjab election results 2022 Bhagwant Mann New CM of Punjab)

पंजाबचे नवे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान (Bhagwant mann) यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1973 रोजी पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील सतोज गावात झाला. 'आप'ने भगवंत मान यांची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा केली होती. त्यावर पंजाबच्या जनतेने आपला निकाल दिला आहे. पंजाबची कमान आता भगवंत मान यांच्या हाती आली आहे.

विनोदी कलाकार म्हणून सुरुवात 

भगवंत मान यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात विनोदी कलाकार म्हणून केली होती. अनेक स्टेज शो आणि चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी नाव कमावले. कपिल शर्माच्या शोमध्ये त्यांना बरीच ओळख मिळाली आणि लोकांना हसवत असताना त्यांच्या मनात राजकारणात ठसा उमटवण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यांनी राजकारणाच्या मैदानात उडी घेतली.

मुलगा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर, भगवंत मान यांच्या आई आणि बहीण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवल्या आणि त्याचा परिणाम त्यांच्या नेतृत्वाखाली 'आप'च्या मोठ्या विजयाच्या रूपात समोर आला. मान यांच्या आईने घरोघरी जाऊन आपल्या मुलाच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले होते आणि जनतेनेही त्यांच्या शब्दाचा आदर करत मान यांना सत्तेच्या शिखरावर पोहोचवले.

मान यांची राजकीय कारकीर्द

आम आदमी पार्टीमध्ये सामील होण्यापूर्वी, मान 2012-14 पासून मनप्रीत सिंग बादल यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स पार्टी ऑफ पंजाबशी संबंधित होते. 2012 साली त्यांनी याच पक्षात असताना निवडणूक लढवली आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. भगवंत मान 2014 पासून संगरूरमधून लोकसभेचे सदस्य आहेत आणि त्याआधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भगवंत मान यांनी विजय मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. कारण संपूर्ण पंजाबमध्ये आम आदमी पार्टीतून फक्त तेच विजयी झाले होते.

भगवंत मान यांनी इंद्रप्रीत कौरशी लग्न केले, पण त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. त्यांच्या वैवाहिक जीवनावर राजकारणाचा परिणाम झाला आणि 2015 मध्ये दोघे वेगळे झाले. विशेष म्हणजे भगवंत आणि इंद्रप्रीत यांना दोन मुलेही आहेत, जी परदेशात राहतात. त्यांची मुलेही फोनवर त्यांच्याशी बोलत नाहीत, ही व्यथाही त्यांनी मुलाखतीदरम्यान अनेकदा मांडली होती.

पंजाबमधील त्यांच्या मजबूत उपस्थितीच्या बळावर, भगवंत मान यांनी अरविंद केजरीवाल यांचा विश्वास जिंकला आणि 18 जानेवारी 2022 रोजी, भगवंत मान पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून पंजाबचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार झाले. यानंतर त्यांनी पंजाबमध्ये सर्वसामान्यांच्या विजयासाठी जोरदार प्रचार केला, त्याचाच प्रत्यय गुरुवारी आलेल्या निवडणूक निकालात दिसून आला.

गुरुवारी जाहीर झालेल्या निवडणुकीच्या निकालात पंजाबमध्ये भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली 'आप'ला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. पंजाबमधील 117 जागांपैकी आम आदमी पक्षाने 89 जागा जिंकल्या आहेत. तर 69 जागांवर आघाडीवर आहेत.

जनतेच्या प्रत्येक सुख-दु:खात भगवंत मान त्यांच्यासोबत उभे राहिले. त्यांनी लोकांच्या व्यथा ऐकून घेतल्या आणि त्यांना आश्वासन दिले. 2022 च्या निवडणुकीत जनतेसोबत असल्याचा फायदा त्यांना मिळाला आणि थेट राज्याचे प्रमुख होण्याचा मार्ग मोकळा झाला.

राजकारणात प्रवेश केल्यानंतर आता पंजाबची कमान हाती घेण्याच्या तयारीत असलेले भगवंत मान खूपच उत्साहित आहेत. निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले आहे की, अनेक वर्षे ते त्यांच्या मुलांशी आणि पत्नीशी फोनवरही बोलत नव्हते. आता सर्वजण माझ्यापासून वेगळे झाले आहेत आणि ते आता पंजाबला त्यांचे संपूर्ण कुटुंब मानतात.