कॉंग्रेससाठी 5 क्विंटल मिर्च्यांचा यज्ञ, साध्वी जिंकल्यावर बाबा गायब

 लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर या बाबाचा शोध सुरु आहे. पण आतापर्यंत कोणीच त्याला शोधू शकले नाही. 

Updated: May 24, 2019, 07:55 PM IST
कॉंग्रेससाठी 5 क्विंटल मिर्च्यांचा यज्ञ, साध्वी जिंकल्यावर बाबा गायब  title=

नवी दिल्ली : देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या भोपाळमध्ये भाजपाच्या साध्वी प्रज्ञा सिंह यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्वीजय सिंह यांना मात दिली. दोन्ही पक्षांनी जिंकून येण्यासाठी या ठिकाणी जोरदार प्रयत्न केले होते. पण कॉंग्रेस जिंकण्यासाठी एका बाबाने 5 क्विंटल मिरच्यांचा यज्ञ केला होता. दिग्विजय यांचाच विजय होईल असे तो विश्वासाने सांगत होता. पण आता निकाल लागल्यानंतर तो बाबा गायब आहे. महामंडलेश्वर वैराग्यनंद गिरी महाराज (मिर्ची बाबा) असे या बाबाचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर या बाबाचा शोध सुरु आहे. पण आतापर्यंत कोणीच त्याला शोधू शकले नाही. त्यामुळे मिर्ची बाबा भुमिगत झाले अशीच चर्चा आहे. 

दिग्विजय सिंह जिंकावे यासाठी मिर्ची बाबाने निवडणुकीआधी 5 क्विंटल मिर्च्यांचा यज्ञ केला होता. भोपाळमध्ये दिग्विजय सिंह यांचाच विजय होईल असे त्याने मीडियाला सांगितले होते. जर भाजपा उमेदवार भोपाळमध्ये जिंकली तर मी जल समाधी घेईन असेही मिर्ची बाबाने म्हटले होते. अशावेळी भोपाळमधील संपूर्ण मीडिया आता मिर्ची बाबाच्या शोधात आहे. बाबा कुठे गेला हीच चर्चा आहे. पण मिर्ची बाबा कोणाच्याच संपर्कात नाही. 

लोकसभा निवडणूक संपण्याआधी मिर्ची बाबा भोपाळमध्ये आला. त्यांने दिग्विजय सिंह यांच्यासाठी 5 क्विंटल मिर्च्यांचा यज्ञ केला. या यज्ञातून त्याने दिग्विजय सिंह यांच्या विजयाची प्रार्थना केली. असे नाही झाले तर मी जलसमाधी घेईन असेही जाहीर करुन टाकले. आता मिर्ची बाबा माध्यमांसमोर आल्यावरच त्यांची भूमिका कळू शकणार आहे.