दाट धुक्यामुळे टाटा सुमोची ट्रकला धडक, भीषण अपघात 15 जण ठार

Karnataka Accident : कर्नाटकात घडलेल्या भीषण अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमो गाडीने रस्त्याला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 26, 2023, 10:36 AM IST
दाट धुक्यामुळे टाटा सुमोची ट्रकला धडक, भीषण अपघात 15 जण ठार title=

Karnataka Accident : कर्नाटकातील (Karnataka) चिकबल्लापूर (Chikkaballapur) येथे भीषण रस्ता अपघात झालाय. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी सकाळी 7.15 वाजता राष्ट्रीय महामार्ग 44 वर चित्रावती वाहतूक पोलीस ठाण्यासमोर हा अपघात घडला. या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये 8 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्ग 44 वर समोरून येणाऱ्या टाटा सुमोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ट्रक आणि सुमो यांच्यात झालेल्या धडकेनंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे देखील काही प्रवाशांचा मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाट धुक्यामुळे सुमो चालकाला रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक दिसला नाही आणि धडक बसली.

गुरुवारी पहाटे बंगळुरूपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिक्कबल्लापूरच्या हद्दीत थांबलेल्या एका ट्रकला मल्टी युटिलिटी व्हेईकलने धडक दिली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृत व्यक्ती हे आंध्र प्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातील गोरंटला भागातील आहे. प्राथमिक तपासात एमयूव्ही आंध्र प्रदेशातून बंगळुरूकडे जात होती आणि दाट धुक्यामुळे वाहन चालकाला रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकला त्याने धडक दिली.

बीडमध्ये भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू

बीडमध्येही दोन अपघातांमध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी झालेल्या या अपघातांमध्ये 10 जणांना जीव गमवावा लागला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले. पहिल्या घटनेत रुग्णवाहिकेची ट्रकला धडक बसून चार जणांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत मुंबईकडे जाणारी बस पलटी होऊन सहा जणांचा मृत्यू झाला आणि अनेक प्रवासी जखमी झाले. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी धामणगावहून अहमदनगरकडे जाणाऱ्या मार्गावर बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पहिला अपघात झाला. बीड अहमदनगर राज्य महामार्गावरील दौलवडगावजवळ सकाळी सहा वाजता मुंबईकडे जाणारी बस उलटली. त्यामुळे सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. बस उलटताच मोठा आवाज झाला. आजूबाजूच्या लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच जामखेड व आष्टी पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.