20 फूट खोल कोसळली प्रवाशांनी भरलेली बस, 7 जणांचा मृत्यू; पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

हा अपघात इतका भयानक होता की सात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे

Updated: Sep 17, 2022, 10:37 PM IST
20 फूट खोल कोसळली प्रवाशांनी भरलेली बस, 7 जणांचा मृत्यू; पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक title=

झारखंडमधील (Jharkhand) हजारीबाग (Hazaribagh Bus Accident) येथील तातीझारिया (Tatijharia) पोलीस स्टेशन हद्दीतील सिवाने नदीच्या पुलाजवळ बसचा भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 60 जण प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. बस गिरिडीहहून (Giridih) रांचीला (Ranchi) जात होती. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे.

सिवाने पुलावरुन प्रवाशांनी भरलेली बस 20 फूट खाली कोसळली. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास झालेल्या या अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू झाला. तर पाच जखमींना रिम्समध्ये पाठवण्यात आले आहे. मृतांमध्ये चार महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. हजारीबाग (Hazaribagh) जिल्ह्यातील बस दुर्घटनेत झालेल्या लोकांच्या मृत्यूबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला (Narendra Modi expressed condolences).

खड्ड्यात चाक गेल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. बस नदीच्या तळाशी पडताच आरडाओरडा झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये हरेंद्र सिंह, राणी सलुजा, रविंदर कौर, गिरिडीह सेवादार यांच्यासह 7 जणांचा समावेश आहे.  जखमींना उपचारासाठी एचएमसीएचमध्ये पाठवण्यात आले आहे. सर्व मृत हे गिरिडीह येथील रहिवासी आहेत. तर एक लुना चालकही जखमी झाला असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बस दुपारी 1.30 वाजता गिरिडीहहून रांचीसाठी निघाली होती. दुपारी चारच्या सुमारास सिवाने नदीच्या पुलावर येताच चाक खड्ड्यात गेले आणि बस सुमारे 20 फूट खाली पडली. 

एका प्रवाशाने सांगितले की, तो रांची येथील गुरुद्वारामध्ये होणाऱ्या समागम कार्यक्रमात सहभागी होणार होता. त्याचदरम्यान हा अपघात झाला. अपघात होताच पुलाखाली आरडाओरडा झाला. अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.