Indian Railway चं तिकीट बुक करतानाच तुम्हाला Seat का निवडता येत नाही?

Indian railway ticket booking : रेल्वेनं प्रवास करत असताना काही गोष्टींबद्दल आपल्याला उगाचच प्रश्न पडतात. रेल्वेमध्ये आपल्याला सीट कशी मिळते हासुद्धा त्यातलाच एक प्रश्न...   

सायली पाटील | Updated: Nov 13, 2023, 12:04 PM IST
Indian Railway चं तिकीट बुक करतानाच तुम्हाला Seat का निवडता येत नाही?  title=
Indian Railway why we can not reserve a seat Interesting Fact

Indian railway ticket booking : भारतीय रेल्वेला एक मोठा इतिहास आहे, किंबहुना भारतीय रेल्वेमुळंच देशातील प्रवास अतिशय सुखकर झाला आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण देशातील सर्वच स्तरातील नागरिकांना रेल्वेनं प्रवास करणं शक्य झालं. यानिमित्तानं देशातील विविध प्रदेशही एकमेकांशी जोडले गेले. अशा या रेल्वे प्रवासासाठी तुम्ही कधी रेल्वेचं तिकीट बुक केलं आहे का? 

तिकीट बुक करताना तुमच्या एक बाब लक्षात आली असेल की, ज्यावेळी तुम्ही तिकीट बुक करता त्यावेळी तुम्हाला आसन अर्थात सीट निवडण्याची मुभा नसते. यामागेही एक खास कारण आहे. IRCTC कडूनच यामागचं कारण सर्वांसमोर आणण्यात आलं आहे. 

एक सोपं उदाहरण घ्या, आपल्याला सहसा चित्रपट किंवा बसचं तिकीट बुक करत असताना आसन निवडण्याचं स्वातंत्र्य असतं. पण, रेल्वेचं तिकीट बुक करताना मात्र ही मुभा मिळत नाही. चित्रपटांसाठी सिनेमागृहात गेलं असता तिथं असणारी आसनव्यवस्था बदलता येत नाही. तर, रेल्वेचं याउलट असतं. त्या सातत्यानं धावत असतात. त्यामुळं आयआरसीटीसी अल्गोरिदमकडून धावत्या रेल्वेवर असणारा प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी म्हणून ऑटोमॅटिक पद्धतीनं प्रवाशांना सीट देतं. 

क्लिष्ट वाटतंय? उदाहरणासह समजून घ्या... 

समजा रेल्वेमध्ये स्लीपर कोच क्रमांक S1, S2, S3...S10 पर्यंत आहे. प्रत्येक कोचमध्ये 72-72 आसनं असतात, आता प्रत्येक व्यक्ती जर पहिल्यांदाच तिकीट बुक करत असेल, तर सॉफ्टवेअरनुसार त्यांना ट्रेनच्या मधोमध असणाऱ्या म्हणजेच S5 डब्यातील पहिली सीट मिळेल. ही सीट 30 ते 40 क्रमांकादरम्यान असेल. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे आयआरसीटीसीकडून सर्वप्रथम लोअर बर्थ बुक करण्यात येते. 

हेसुद्धा वाचा : सिडकोच्या घरांच्या किमती 4 ते 5 लाखांनी कमी होणार; पाहा तुम्हाला कसा मिळणार फायदा... 

रेल्वेच्या प्रत्येक कोचमध्ये प्रवाशांची संख्या समसमान असेल यावर आयआरसीटीसीच्या सॉफ्टवेअरचं लक्ष असतं. ही प्रक्रिया मधील आसनांपासून सुरु होते आणि त्यानंतर दारापाशी असणाऱ्या आसनांपर्यंत जाते. सर्वाधिक सेंट्रीफ्यूगल फोर्स (Centrifugal Force) मुळं रेल्वे रुळावरून घसरण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं प्रवाशांचा भार योग्य रितीनं विभागण्यासाठीच रेल्वेकडून हे तंत्र अवलंबलं जातं.