'नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान' अमित शहांचं विरोधकांना उत्तर

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी मोदी सरकारविरोधाक अविश्वास ठराव मांडला आहे. यावर लोकसभेत गेले दोन दिवस चर्चा सुरु आहे. मणिपूर मुद्दयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. याला आता गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 9, 2023, 06:02 PM IST
'नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान'  अमित शहांचं विरोधकांना उत्तर title=

No-Confidence Motion Live: अविश्वास ठरावावरील चर्चा  आज दुसऱ्या दिवशीही सुरु आहे. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर  (PM Narendra Modi) निशाणा साधला.पंतप्रधान मणिपूरला (Manipur Violence) गेले नाहीत. कारण त्यांच्यासाठी मणिपूर भारतात नाही. मणिपूरमध्ये भारताची हत्या झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. यावर आता गृहमंत्री अमित शहा विरोधकांना उत्तर देत आहेत. स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. 9 वर्षात पंतप्रधानांनी असे 50 हून अधिक निर्णय घेतले जे युगानुयुगे स्मरणात राहतील असं अमित शहा यांनी म्हटलंय.

कोरोना काळात मोदींवर विश्वास
कोरोनावर काळातील कामांवर बोलताना अमित शहा यांनी जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवल्याचं सांगितलं. कोरोनाच्या काळात अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी लोकांना सांगितलं ही मोदी लस आहे घेऊ नका. पण जनतेने मोदींवर विश्वास दाखवला आणि लोकांनी डोस घेतले. लॉकडाऊनलाही विरोध करण्यात आला. विरोधी पक्ष म्हणाले की लॉकडाऊन लावला तर गरीब काय खातील. पण मोदी सरकारने लॉकडाऊन लावला आणि गरीबांना उपाशी देखील ठेवलं नाही. 80 कोटी लोकांना मोफत गहू दिला. विरोधी पक्षांचा मोदींवर विश्‍वास नसला तरी देशातील जनतेचा विश्‍वास मोदींवर असून ते नेहमी पंतप्रधान मोदींबरोबर आहेत. असं शहा म्हणाले.

काँग्रेसने आश्वासनं दिली, आम्ही पूर्ण केली
काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला. पण देशातील गरिबी जराही कमी झाली नाही. पण पंतप्रधान मोदींना देशातील गरीबी कळली कारण त्यांनी गरीबी जवळून पाहिली आहे. पंतप्रधान मोदींनी गेल्या 9 वर्षांत 11 कोटींहून अधिक कुटुंबांना शौचालयं दिली. 'हर घर जल योजने'तून 12 कोटींहून अधिक लोकांच्या घरात पाणी आणलं. काँग्रसेने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं लॉलीपॉप दिलं. पण शेतकऱ्यांना कर्ज घ्यावच लागू नये हा भाजपाचा अजेंडा असल्याचं शहा म्हणाले. 

लोकसभेत आतापर्यंत 27 अविश्वास आणि 11 अविश्वास प्रस्ताव आले आहेत.  पंतप्रधान मोदी आणि मंत्रिमंडळावर जनतेचा अजिबात अविश्वास नाही. पण विरोधकांचा उद्देश केवळ जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे हा आहे. एनडीए दोनदा दोन तृतीयांश बहुमताने निवडून आलं आहे. काँग्रेसचे चारित्र्य भ्रष्टाचाराचे आहे. तर भाजप चारित्र्याचं राजकारण करणार असं अमित शहा म्हणाले. 

देशातील गरीबांची बँक खाती उघडण्यासाठी जन धन योजना आणली तेव्हा नितीश कुमार यांनी खिल्ली उडवली. खातं उघडलं पण त्यात टाकणार काय असा सवाल उपस्थित करण्यात आला. पण मोदी सरकारने 49 कोटी बँक खाती उघडली असून ज्यात 2 लाख कोटी गरिबांसाठी जमा केले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या 300 हून अधिक योजनांचे पैसे थेट या खात्यांमध्ये जातात. 

राहुल गांधी यांच्यावर निशाणा
अमित शहा यांनी आपल्या भाषणात राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. या सभागृहात एक असा नेता आहे ज्याला 13 वेळा राजकारणात आणलं गेलं. पण प्रत्येक वेळी त्यांचं लॉन्चिंग अयशस्वी झालं. त्या नेत्याने बुंदेलखंडमध्ये कलावती नावाच्या एका महिलेच्या घरी जेवण केलं. संसदेत तिच्या गरीबीचं वर्ण केलं. त्यानंतर सहा वर्ष केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. पण त्या कलावतीसाटी काहीच गेलं नाही. त्या कलावतीला घर, वीज, गॅस, धान्य, शौचालय, आरोग्य देण्याचे काम नरेंद्र मोदींनी केलं. ज्या कलावतींच्या घरी तुम्ही जेवायला गेलात, तिचाही मोदींवर विश्वास आहे. 

सर्जिकल आणि एअर स्ट्राईकचा उल्लेख
अमित शहा यांनी आपल्या भाषणात देशाच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला.  यूपीए सरकारच्या काळात म्हणजे 2004-14 दरम्यान दहशतवादी सीमेपलीकडून घुसायचे आणि सैनिकांचे शिरच्छेद करायचे. कोणीही उत्तर देत नव्हतं. पणमोदी सरकारच्या काळात दोन वेळा पाकिस्तानात घुसून हल्ला केला. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राइक करत पाकिस्तानात घुसून दहशतवादयांचा खात्मा केल्याचं त्यांनी सांगितलं. युपीए सरकारमध्ये सर्वात जास्त घोटाळा सुरक्षा क्षेत्रात झाल्याचा आरोपही अमित शहा यांनी केला.