बायको शिकली फरार झाली! लग्नाच्या 13 वर्षानंतर पतीने शिक्षिका बनवले, 'ती' हेडमास्टरसोबत पसार

उत्तर प्रदेश राज्य सेवा अधिकारी ज्योती मौर्य प्रकरण उजेडात आल्यानंतर आता अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत. असाच प्रकार बिहारमध्ये घडलाय. शिक्षिका बनल्यावर पत्नी सोडून गेली आहे. 

Updated: Jul 10, 2023, 04:26 PM IST
बायको शिकली फरार झाली! लग्नाच्या 13 वर्षानंतर पतीने शिक्षिका बनवले, 'ती' हेडमास्टरसोबत पसार  title=

Bihar News: उत्तर प्रदेश राज्य सेवा अधिकारी ज्योती मौर्य (Jyoti Maurya) यांना त्यांच्या पतीने स्वकमाईने शिक्षण दिले. मात्र, अधिकारी होताच ज्योती मौर्य यांनी फसवल्याचा आरोप त्यांच्या पतीने केला आहे. प्रकरणानंतर आता अशीच अनेक प्रकरण समोर येत आहे.  बिहारमध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. एका मजुराने लग्नाच्या 13 वर्षानंतर पत्नीला शिक्षिका बनवले तिला शिक्षिकेची नोकरी देखील मिळाली. मात्र, शिक्षिका बनल्यानंतर दोन मुलांना सोडून पत्नी हेडमास्टरसोबत पसार झाल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण?

बिहारच्या समस्तीपूरमध्ये हा प्रकार घडला आहे. लग्नाच्या 13 वर्षांनंतर पतीने पत्नीला शिक्षण देऊन तिला शिक्षिका होण्यासाठी मदत केली. मात्र, शिक्षिका झाल्यानंतर महिला त्याला सोडून पळून गेली. संसार सोडून पत्नी फरार झाल्याने पतीचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे.  न्याय मिळावा म्हणून  पतीने थेट पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

चंदन कुमार असे पीडित पतीचे नाव आहे. चंदन कुमार यांनी वैशाली जिल्ह्यातील जंदाहा पोलिस ठाण्यात पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. 13 वर्षांपूर्वी हिंदू रितीरिवाजांनुसार चंदन आणि त्यांचे पत्नीचा विवाह झाला होता. लग्नानंतर चंदन यांच्या पत्नीला शिक्षण घ्यायचे होते. पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी चंदनने मोलमजुरी करून कर्ज घेऊन शिक्षण सुरू ठेवले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने पत्नीला डीएलईडीसह आवश्यक प्रशिक्षणही दिले.  

पत्नीला शिक्षिकेची नोकरी मिळाली

2022 मध्ये चंदन कुमार यांच्या पत्नीला पाटोरी उपविभागातील जोरपुरा येथील सरकारी शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. यादरम्यान त्याची पत्नी शाळेजवळच राहू लागली. ती घरी देखील येत नव्हती. चंदन कुमार याने शाळेत चौकशी केली. यावेळी पत्नीने शाळेत दोन महिन्यांची सुट्टी टाकली असल्याचे त्याला समजले. दरम्यान पत्नीचा शोध घेतला असता पत्नी शाळेच्या मुख्याध्यापकासह फरार झाल्याचे समजले. हे सर्व समजल्यावर चंदन याला मोठा धक्का बसला. 

दोन मुलांना सोडून पळून गेली

घरी दोन मुले आणि आपली वृद्ध आई आहे. या कुणाचाही विचार न करता पत्नी फरार झाली आहे. यामुळे पतीने पत्नीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.