हरियाणालातल्या दंगलीत 6 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री म्हणतात 'आम्ही प्रत्येकाचं रक्षण करु शकत नाही'

Haryana Nuh Violence : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी नूह हिंसाचारावर मोठे वक्तव्य केले आहे. कोणत्याही दंगेखोरांना सोडले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 

आकाश नेटके | Updated: Aug 2, 2023, 04:36 PM IST
हरियाणालातल्या दंगलीत 6 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री म्हणतात 'आम्ही प्रत्येकाचं रक्षण करु शकत नाही' title=
(फोटो सौजन्य - PTI)

Nuh Violence : हरियाणामधील (Haryana News) नुह येथे सोमवारी सुरू झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दले तैनात करण्यात आली आहेत.  धार्मिक यात्रेनंतर झालेल्या हिंसाचारानंतर मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली आहे. अशातच आता हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (CM Manoharlal Khattar) यांनी या हिंसाचाराबाबत भाष्य केले आहे. पोलीस (Haryana Police) सर्वांना संरक्षण देऊ शकत नाहीत असे विधान मुख्यमंत्री खट्टर यांनी केले आहे.

दंगलखोरांकडून  नुकसान भरपाई घेणार

हरियाणामधील नूह जिल्ह्यापासून सुरू झालेला जातीय हिंसाचार पलवल आणि सोहनापर्यंत पसरला आहे. मंगळवारी रात्री दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्रामपर्यंत हा हिंसाचार पोहोचला आहे. या हिंसाचाराबाबत मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. "हिंसाचारात जे काही नुकसान झाले आहे ते दंगलखोरांकडून वसूल केले जाईल. दंगलखोरांवर कडक कारवाई केली जाईल. लोकांनी त्यांच्या नुकसानीची माहिती द्यावी. आम्ही लोकांच्या झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करू.  तसेच आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. मी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो," असे मनोहरलाल खट्टर म्हणाले.

प्रत्येक व्यक्तीचे संरक्षण करू शकत नाहीत - मनोहरलाल खट्टर

"राज्याची लोकसंख्या 2.7 कोटी आहे. आमच्याकडे 60 हजार जवान आहेत. अशा परिस्थितीत पोलीस प्रत्येक व्यक्तीचे संरक्षण करू शकत नाहीत. आम्ही निमलष्करी दलाच्या चार अतिरिक्त कंपन्या मागवल्या आहेत. पण पोलीस किंवा लष्करही सुरक्षेची हमी देऊ शकत नाही. आपण शांतता आणि सौहार्द राखले पाहिजे. नूहमध्ये गोरक्षणाचे प्रश्न आहेत. या प्रकरणाच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर असेल. या प्रकरणात 100 जवान तैनात करण्यात येणार आहेत. मी मुस्लिम तरुणांना गोरक्षणासाठी पुढे येण्यास आवाहन करतो," असेही खट्टर म्हणाले.

हजारो कॉल, सीसीटीव्हींची तपासणी

"या हिंसाचारात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन पोलीस आणि चार नागरिकांचा समावेश आहे. या प्रकरणी आतापर्यंत 116 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 190 आरोपी अटकेत आहेत. दंगलखोरांची ओळख पटवून त्यांना नुकसान भरपाई देण्याचे आम्ही ठरवले आहे. राजस्थान पोलिसांनी मोनू मानेसरवर गुन्हा दाखल केला आहे, परंतु आमच्याकडे काहीही माहिती नाही. राजस्थान पोलीस या कामात गुंतले आहेत. आम्ही हजारो कॉल, सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करत आहोत. या सर्वांची चौकशी करण्यात आली आहे," असे खट्टर म्हणाले.