काश्मीरमध्ये 600 वर्षांपूर्वी मुस्लीम नव्हते; पंडित धर्मांतर करुन मुस्लीम झाले : गुलाम नबी आझाद

Ghulam Nabi Azad On Hindu Muslim: एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना गुलाम नबी आझाद यांनी हिंदू आणि मुस्लिमांसंदर्भात भाष्य केलं असून त्यांनी 600 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये मुस्लीम नव्हते असंही म्हटलं आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या या मतामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 17, 2023, 02:34 PM IST
काश्मीरमध्ये 600 वर्षांपूर्वी मुस्लीम नव्हते; पंडित धर्मांतर करुन मुस्लीम झाले : गुलाम नबी आझाद title=
एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना केलं विधान

Ghulam Nabi Azad On Hindu Muslim: काँग्रेसचे माजी नेते आणि डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी हिंदू धर्मासंदर्भात महत्वाचं विधान केलं आहे. जम्मू काश्मीरमधील एका सार्वजनिक बैठकीमध्य गुलाम नबी आझाद यांनी, "काश्मीरमधील सर्व लोक हिंदू धर्मातून धर्मांतर करुन मुस्लीम झाले आहे. बाहेरुन फार मोजके लोक इथे आले आहेत. बाकी सर्वजण मूळचे हिंदूच आहेत," असं म्हटलं आहे. खास करुन काश्मीरच्या मुद्द्याचा उल्लेख करत त्यांनी, "काश्मीरमध्ये आजपासून 600 वर्षांपूर्वी मुस्लीम लोकचं नव्हती. सर्वजण धर्मांतर करुन मुस्लीम झाले आहेत," असं म्हटलं. "इथे केवळ काश्मीरी पंडित होते. सर्वजण धर्मांतर करुन मुस्लीम झाले. आम्ही बाहेरुन आलेलो नाही. आमचा जन्म इथलाच आहे आणि इथेच आम्ही संपणार," असंही आझाद यांनी म्हटलं आहे.

इस्लामचा जन्म 1500 वर्षांपूर्वीचा

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री असलेल्या आझाद यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आझाद हे जम्मू-काश्मीरमधील लोकांना हिंदू धर्म हा इस्लामपेक्षा जुना असल्याचं सांगत आहेत. सर्व मुस्लीम आधी हिंदूच होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ 9 ऑगस्टचा आहे. गुलाम नबी आझाद डोडा येथे एका कार्यक्रमामध्ये भाषण करताना त्यांनी या धार्मिक बाबींचा उल्लेख केला. "इस्लामचा जन्म हा 1500 वर्षांपूर्वी झाला. भारतामध्ये कोणीही बाहेरुन आलेलं नाही. आपण सर्वजण याच देशातले आहोत. भारतातील मुस्लीम हे मूळचे हिंदूच आहेत. त्यांनी नंतर धर्मांतर केलं," असं आझाद म्हणाले.

धर्माला राजकारणाशी जोडू नये

डोडामधील आपल्या या भाषणामध्ये आझाद यांनी, "काश्मीरमध्ये 600 वर्षांपूर्वी फक्त काश्मीरी पंडित वास्तव्य करत होते. नंतर अनेकांनी धर्मांतर करुन मुस्लीम धर्म स्वीकारला. त्यामुळेच सर्वांना माझी विनंती आहे की एकमेकांबद्दल बंधुभाव कायम ठेवा. शांतता आणि एकता कायम राहील याची काळजी घ्या," असं आवाहन केलं. "धर्माला राजकारणाशी जोडता कामा नये. लोकांकडून धर्माच्या आधारावर मतं मागू नये," असंही आझाद यांनी म्हटलं. 

सर्वांना या मातीतच मिसळायचं आहे

आपले हिंदू बांधव पार्थिव अग्नीच्या स्वाधीन करतात. त्यानंतर ते अस्थी नदीमध्ये विसर्जित करतात. आपल्याकडे मुस्लीम बांधव मरण पावल्यानंतर त्याचं पार्थिव जमीनीत पुरतात. आपल्या सर्वांचा देह तर याच भारत मातेच्या मातीत मिसळतो. त्यामुळे हिंदू मुस्लीम भेदभाव योग्य नाही. इथल्या मातीतच आपल्या सर्वांना जायचं आहे, असंही आझाद यांनी म्हटलं.

देशभरातून प्रतिक्रिया

आझाद यांच्या या विधानावरुन देशभरातून प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहे. स्वामी चक्रपाणि यांनी "हे खरं आहे. हे खरं आहे की भारतामध्ये जे धर्मपरिवर्तन झालं ते सगळे हिंदू होते. आम्ही त्यांना हिंदू धर्मात येण्याचं आमंत्रण देतो. जे येतील त्यांचं स्वागत आहे. गुलाम नबी आझाद यांनी यासंदर्भात आपलं मत व्यक्त केलं आहे," असं स्वामी चक्रपाणि म्हणाले.