'एका दिवसात चित्रपट १०० कोटी कमवतात; मग आर्थिक मंदी कसली ?'

केंद्रीय मंत्र्यांचा अजब सवाल 

Updated: Oct 13, 2019, 08:35 AM IST
'एका दिवसात चित्रपट १०० कोटी कमवतात; मग आर्थिक मंदी  कसली ?'  title=

मुंबई : देशात आर्थिक मंदीची लाट येत असल्याचं निरिक्षण अनेकांनीच वर्तवलं असताना केंद्रीय मंत्रीमहोयदयांचं मात्र या परिस्थितीवर अतिशय वेगळं मत आहे. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी भारतीय अर्थव्यवस्था अगदी सुरळीतपणे कार्यरत असल्याचं मत शनिवारी मांडलं. यावेळी त्यांनी आपल्या या वक्तव्याचा सिद्ध करण्यासाठी म्हणून एक अजब उदाहरणही दिलं. 

आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने सुरु असणाऱ्या भाजपाच्या प्रचारादरम्यान मुंबईत त्यांनी हे वक्तव्य केलं. तीन चित्रपटांच्या कमाईचा आधार घेत यातून मात्र अर्थव्यवस्थेचं वेगळं चित्र समोर येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. '२ ऑक्टोबर या सुट्टीच्या दिवशी तीन हिंदी चित्रपटांनी जवळपास १२० कोटींचा गल्ला जमवला. आता अर्थव्यवस्था सुरळीत नसल्याशिवाय फक्त या तीन चित्रपटांनी अवघ्या एकाच दिवसात इतकी कमाई कशी केली?', असं ते 'पीटीआय'शी संवाद साधत म्हणाले. 

पाच वर्षांमध्ये देशाची अर्थव्यस्था मंदीच्या वाटेवर असल्याचं काही दिवसांपूर्वीच समोर आलं. ज्यानंतर काहीजण बेरोजगारीच्या मुद्द्याचा वापर करत जनतेची दिशाभूल करत आहेत. 'आम्ही सर्वांना सरकारी नोकऱ्या देऊ असं कधीच म्हटलं नव्हतं', असं म्हणत रवीशंकर प्रसाद यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी मांडल्या. माहिती आणि तंत्रज्ञान, मुद्रा लोन आणि वाणिज्य शाखेत चांगली प्रगती होत असल्याचं ते म्हणाले. 

करदात्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याचं सांगत जागतिक मंदीच्या काळातही देशाची आर्थिक वाटचाल ही ६ टक्क्यांहून अधिक इतक्या गतीने होत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या, तर काहींचं लक्ष पुन्हा एकदा देशाच्या अर्थव्यवस्थेकडे वेधलं गेलं.