भारतात कोरोनाची साथ नक्की कधी आटोक्यात येणार; आरोग्यमंत्री म्हणाले...

उरले फक्त काही महिने....   

Updated: Aug 31, 2020, 04:44 PM IST
भारतात कोरोनाची साथ नक्की कधी आटोक्यात येणार; आरोग्यमंत्री म्हणाले...  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : संपूर्ण जगासह भारतातही CORONAVIRUS कोरोना व्हायरचं थैमान काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहे. देशभरामध्ये सध्याच्या घडीला कोरोना रुग्णांची संख्या आता ३६ लाखांच्याही पलीकडे गेला आहे. या विषाणूच्या संसर्गामुळं कोरोनाची बाधा झालेल्या ६४,४६९ रुग्णांचा जीव गेला आहे. रुग्णसंख्येचा हा आकडा आणि आलेख वर जात असतानाच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. 

आरोग्यमंत्र्यांनी देशातील कोरोनाची साथ नियंत्रणात केव्हा येणार या प्रश्नाचं उत्तर देत देशातील नागरिकांना दिलासा दिला आहे. हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार दिवाळीपर्यंत देशातील कोरोना व्हायरसची साथ बऱ्याच अंशी नियंत्रणात आलेली असेल. बंगळुरू येथे अनंत कुमार फाऊंडेशनकडून आयोजित करण्यात आलेल्या 'नेशन फर्स्ट', या वेब सेमिनार दरम्यान त्यांनी ही माहिती दिली. 

'दिवाळीपर्यंत कोरोनाच्या संसर्गाला परिणामकारकरित्या नियंत्रणात आणण्यात येईल. सर्वजण कोरोनासोबतच्या या लढाईमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत', असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी कोरोना लसीची चाचणी वेगानं सुरु असल्याचीही माहिती दिली. 

'लसीची चाचणी अतिशय वेगानं सुरु आहे. तीन लसींची क्लिनिकल आणि चार प्री- क्लिनिकल चाचण्या सुरु आहेत. आम्ही आशा करतो की या वर्षाच्या अखेरीस कोरोनाची लस सापडेल. आजच्या घडीला दर दिवशी जवळपास ५ लाख पीपीई किटची निर्मिती केली जात आहे. तर दहा लाखांहून अधिक N95 मास्क तयार करण्यात येत आहेत', असं हर्षवर्धन म्हणाले. 

 

कोरोनामुळे उदभववलेली परिस्थिती पाहता याच्याशी देशाचा लढा नेमका कोणत्या स्तरावर सुरु आहे, याबाबतची माहितीही त्यांनी दिली. इकतकंच नव्हे, तर त्यांनी दिवाळीपर्यंत कोरोना मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आलेला असेल असं म्हणत एक आशेचा किरण दिला.