Salman Khan ला कसला धोका? लॉरेन्स बिश्नोई गँग का उठलीय जीवावर... जाणून घ्या Inside Story

Salman Khan Treat : लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पण सलमानला मारण्याचा प्लान हा आधीच ठरला होता. त्यासाठी रेकी झाली आणि रायफलही मागवण्या आली होती.

Updated: Mar 20, 2023, 08:49 PM IST
Salman Khan ला कसला धोका? लॉरेन्स बिश्नोई गँग का उठलीय जीवावर... जाणून घ्या Inside Story title=

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानला जीवे मारण्याची धमकी ( Salman Khan Death Threat) देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आधी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) आणि आता गँगस्टर गोल्डी बराडने (Goldie Brar) सलमानला धमकी दिली आहे. यानंतर सलमानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. पण यामागे नेमकं कारण तरी काय असा प्रश्न देशभरातील चाहत्यांना पडला आहे. तर याचा संबंध काळवीट शिकार (Blackbuck Hunting) प्रकरणाशी जोडला गेला आहे. आता प्रश्न असा आहे की गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा या प्रकरणाशी काय संबंध? तो आणि त्यांची गँग सलमान खानच्या जीवावर का उठली आहे?

कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?
लॉरेन्स बिश्नोई हा कुख्यात गँगस्टर (Gangstar) असून सध्या तो तिहार जेलमध्ये बंद आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत. इतकंच नाही तर तो तुरुंगातून आपली गँग चालवतोय. तुरुंगाबाहेर ही गँग सध्या गोल्डी बराड आणि त्याचा मामेभाऊ सचिन बिश्नोई चालवतायत. हे दोघंही सध्या कॅनडात लपलेत. याशिवाय ऑस्ट्रीयामधून अनमोल आणि कॅनडातून विक्रम बराड आर्थिक देवाण-घेवाणाची कामं सांभाळतात. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लॉरेन्स बिश्नोई गँगशी जवळपास एक हजार तरुण जोडले गेलेत. यात शार्फ शुटर्स, कॅरिअर, सप्लायर, रेकी करणारे, शेल्टर मॅन आणि सोशल मीडिया विंगचे सदस्य सहभागी आहेत. गेल्या वर्षी झालेल्या पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचं समोर आलं होतं. 

काळवीट आणि बिश्नोई समाज
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा बिश्नोई समाजाचा आहे. हा समाज राजस्थानमधल्या जोधपूरजवळच्या थार वाळवंटाशी संबंधीत आहे. हा समाज नैसर्गिक गोष्टींवर प्रेम करणारा आहे, विशेष म्हणजे प्राण्यांना हा समाज देव मानतो. त्यातही हरिण हा प्राणी त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. काळवीटाची ते पूजा करतात. त्यामुळेच हरणाच्या रक्षणासाठी हा समाज आपल्या जीवाचीही बाजी लावताना दिसतो. राजस्थानमधल्या काही गावात तर महिला हरिणाच्या बछड्यांना आपलं दूध पाजतात. 

बिश्नोई समाजाचे नियम
प्राण्यांचं रक्षण करताना मृत्यू आल्यास बिश्नोई समाजात त्या व्यक्तीला शहीदांचा दर्जा दिला जातो.  प्राण्यांच रक्षण करणं, हिरवीगार झाडं न तोडणं असे काही नियम या समाजाने आखले आहेत. त्यातली काळविटाला या समाजात देवाचं स्थान आहे. जोधपुरच्या राजाने झाडं कापण्याचा आदेश दिल्यानंतर बिश्नोई समाजाने झाडांना मिठी मारत आंदोलन केलं होतं. यात जवळपास 363 बिश्नोई समाजातील लोकांचा मृत्यू झाला होता.

सलमानला धमकी देण्याचं कारण
1998 मध्ये सलमान खानने काळविटाची शिकार केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. तेव्हापासून बिश्नोई समाज सलमान खानच्या विरोधात आहेत. त्याच्या चित्रपटांवरही बहिष्कार घातला जातो, इतकंच काय तर त्याची गाणीही या समाजातील लोकं ऐकत नाहीत. हा समाज दुर्बल मानला जात असल्याने त्यांनी सलमानविरुद्ध आजपर्यंत आवाज उठवला नव्हता. पण गुन्हेगारीच्या जगतात लॉरेन्स बिश्नोईचं नाव चर्चेत आलं आणि त्याने थेट सलमानलाच जीवे मारण्याची धमकी दिली. 

सलमानच्या घराची रेकी
जून 2021 मध्ये पोलिसांच्या तपासाता एक धक्कादायक खुलासा झाला होता. सलमान खानाल मारण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईने राजस्थानमधला कुख्यात गुंड संपत नेहरावर जबाबदारी सोपवली होती. यानंतर संपत नेहराने मुंबईत येऊन सलमानच्या घराची रेकीदेखील केली होती. सलमानला मारण्यासाठी संपत नेहराने स्प्रिंग रायफल मागवली होती. सुदैवाने पोलिसांना याचा सुगावा लागला आणि संपत नेहराला अटक करण्यात आली. 

काय आहे काळविट शिकार प्रकरण
1998 च्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात जोधपूरमध्ये हम साथ साथ है या चित्रपटाचं शुटिंग सुरु होतं. या शुटिंगदरम्यान सलमान खान आपल्या काही सहकलाकारांबरोबर भवाद गावाजवळ शिकारीसाठी गेला होता. 27-28 सप्टेंबर 1998 च्या रात्री घोडा फार्म हाऊसजवळ एका काळविटाची शिकार करण्यात आली. याचा आरोप सलमान खानवर करण्यात आला आणि त्यासाठी त्याला दोषी ठरवण्यात आलं. याप्रकरणात सलमानला चारवेळा तुरुंगात जावं लागलं आणि प्रत्येकवेळी जामिनावर तो बाहेर आला.