Kejirwal Slams PM Modi: मोदींच्या शिक्षणावरुन केजरीवालांचा टोला; म्हणाले, "पंतप्रधान शिकलेले असते तर..."

Kejriwal dig at PM Modi: आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

Updated: Mar 15, 2023, 02:09 PM IST
Kejirwal Slams PM Modi: मोदींच्या शिक्षणावरुन केजरीवालांचा टोला; म्हणाले, "पंतप्रधान शिकलेले असते तर..." title=
Kejirwal Slams Modi

Kejriwal Slams PM Modi: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मंगळवारी पंतप्रदान नरेंद्र मोदींवर (PM Modi) निशाणा साधला. आपल्या दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आल्याच्या मुद्याबरोबरच नोटबंदीच्या मुद्द्यावरुन पंतप्रधानांवर टीका करताना केजरीवाल यांनी देशाच्या पंतप्रधानपदी असलेली व्यक्ती शिकलेली असणं गरजेचं आहे, असं म्हटलं आहे. शैक्षणिक पात्रता कमी असलेल्या पंतप्रधानांना कोणीही फसवू शकतं, असं केजरीवाल यांनी भोपाळमधील दशहरा मैदानामधील आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या संमेलनाला संबोधित करताना म्हटलं. 

त्यांना दोघांनाही तुरुंगात टाकलं

"माझ्या दोन चांगल्या मंत्र्यांना अटक केली. एक आहेत सत्येन्द्र जैन ज्यांनी दिल्लीमध्ये मोफत वीज, आरोग्य आणि औषध सेवा सुरु केली होती. त्यांनीच मोहल्ला क्लिनिक सुरु केलं होतं. त्यांना पंतप्रधानांनी तुरुंगात टाकलं आहे. दुसरे आहेत मनीष सिसोदिया. ज्यांनी दिल्लीतील गरीब मुलांना चांगलं शिक्षण दिलं. पंतप्रधानांनी सिसोदिया यांनाही तुरुंगात टाकलं," असं केजरीवाल म्हणाले.

...तर सिसोदियांना देशाचं शिक्षणंत्री केलं असतं

केजरीवाल यांनी मोदींना टोला लगावताना, "ज्या दिवशी सिसोदिया यांना तुरुंगात पाठवण्यात आला त्या दिवशी मला वाटलं की देशाचे पंतप्रधान शिकलेले असणं फार आवश्यक आहे. जर ते शिकलेले असते तर त्यांना शिक्षणाचं महत्त्वं समजलं असतं. पंतप्रधान देशभक्त असते तर त्यांनी सिसोदिया कोणत्या पक्षाचे आहेत याचा विचार केला नसता. त्यांनी सिसोदियांना देशाचं शिक्षणमंत्री पद दिलं असतं," असंही म्हणाले.

नोटबंदीवरुनच टोला

नोटबंदीच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींवर केजरीवाल यांनी टीका केली. "प्रधानमंत्री शिकलेले असणं आवश्यक आहे. असं असेल तर कमी शिकलेल्या पंतप्रधानांना कोणीही फसवू शकतं. नोटबंदी करा म्हणजे भ्रष्टाचार-दहशतवाद संपेल, (असं त्यांना सांगण्यात आलं)" असंही केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांनी मंचावरुन कार्यकर्त्यांना "नोटबंदीमुळे भ्रष्टाचार-दहशतवाद कमी झाला का?" असा सवाल केला. यावर सर्व कार्यकर्त्यांनी 'नाही' असं उत्तर दिलं. "शिकलेल्या पंतप्रधानांना अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि विज्ञानाचं ज्ञान असतं. नोटबंदीमुळे संपूर्ण देशातील उद्योग बंद झाले. भ्रष्टाचारही संपला नाही आणि दहशतवादही संपला नाही," असं केजरीवाल म्हणाले.

कोरोनावरुन केली टीका

कोरोना संकटाच्या कालावधीमध्ये लोकांना थाळ्या वाजवण्याचं आवाहन त्यांनी केलं, असं म्हणत केजरीवाल यांनी मोदींवर निशाणा साधला. "पंतप्रधानांनी कोरोना विषाणूचा नाश करण्यासाठी तुमच्याकडून घंटा वाजवून घेतल्या. त्याने कोरोना संपला का? त्यामुळेच मी म्हणतो की पंतप्रधान हे सुशिक्षित हवेत," असं म्हणत केजरीवाल यांनी टोला लगावला.