तेलंगणात अडकलेल्या कामगारांसाठी पहिली विशेष ट्रेन धावली

लॉकडाऊनच्या काळात पहिल्यांदा धावली ट्रेन 

Updated: May 1, 2020, 02:23 PM IST
तेलंगणात अडकलेल्या  कामगारांसाठी पहिली विशेष ट्रेन धावली  title=

नवी दिल्ली: ३ मे रोजी दुसऱ्यांदा घोषित केलेला लॉकडाऊन संपणार असणार आहे. पण या अगोदरच लॉकडाऊनच्या काळात देशात पहिली रेल्वे धावल्याची माहिती समोर आली आहे. हैदराबाद (लिंगमपल्ली) ते  झारखंड (हटिया) या मार्गावर ही विशेष रेल्वे चालवण्यात आली. तेलंगणा सरकारच्या विनंतीनंतर रेल्वे विभागाकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून ही विशेष रेल्वे चालवण्यात आल्याचे समजते. 

बल्लारपूर रेल्वे स्थानकावर मजुरांनी भरलेली पहिली प्रवासी रेल्वेगाडी थांबवण्यात आली. हैदराबाद ते झारखंडच्या हटीया असा या ट्रेनचा प्रवास आहेत. रेल्वेत एकूण १२०० मजूर उपस्थित होते. हैद्राबाद येथे खोळंबलेले मजूर गावाकडे गेले. बल्लारपूर स्थानकावर या मजुरांना पाणी आणि भोजन देण्यात आलं. 

महाराष्ट्रातही लॉकडाऊनमुळे परराज्यातील अनेक मजूर आणि स्थलांतरित कामगार अडकून पडले आहेत. हे सर्वजण आपापल्या गावी जाऊ देण्याची मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी थोड्या दिवसांसाठी तरी रेल्वे सुरु करावी, अशी मागणी केली होती. 

या संदर्भात आज पहाटे साडे चारच्या सुमारास पहिली ट्रेन धावली आहे. या ट्रेनमध्ये जवळपास १२०० मजुर होते. या मजुरांना घेऊन ही ट्रेन धावली आहे. या ट्रेनमध्ये सर्व सोशल डिस्टन्शिंगचे नियम पाळण्यात आले.