देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या 4 लाख केसेस, 4 हजाराहून अधिक मृत्यू

 देशात एका दिवसात विक्रमी 4200 कोरोना रुग्णांचा मृत्यू 

Updated: May 8, 2021, 10:03 AM IST
देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या 4 लाख केसेस, 4 हजाराहून अधिक मृत्यू title=

नवी दिल्ली : भारतातील कोरोनाव्हायरस परिस्थिती (Coronavirus in India) अधिकच बिघडत चालली आहे. कोरोनाच्या नवीन केसेसमध्ये झपाट्याने वाढ होत असताना मृतांच्या संख्येतही वाढ दिसून येत आहे. भारतामध्ये सलग तिसर्‍या दिवशी कोरोनाचे 4 लाखाहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, गेल्या 24 तासांत, देशात एका दिवसात विक्रमी 4200 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जी आतापर्यंत एकाच दिवसात मृत्यूची सर्वाधिक संख्या आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या 24 तासांत भारतात 4,01,217 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर या काळात 4 हजाराहून अधिक लोक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले. यानंतर, भारतातील कोरोनाची लागण होण्याची एकूण संख्या 2 कोटी 18 लाख 86 हजार 556 इतकी झाली. तर देशात सुमारे 37 लाख एक्टीव्ह केसेस आहेत.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. गेल्या 24 तासांत 54 हजार 22 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 898 रूग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 37 हजार 386 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या 6 लाख 54 हजार 788 इतकी आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 74 हजार 43 जणांचा मृत्यू झाला आहे. 

मुंबईत गेल्या 24 तासात 3 हजार 39 रुग्णांची वाढ झाली आहे. तर 4 हजार 52  जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 71 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत अजून एकूण 49 हजार 499 सक्रिय रुग्ण आहेत. 

कल्याण डोंबिवली क्षेत्रात 24 तासात सर्वाधिक 14 कोरोना रुग्णांचे मृत्यू झाला असून  714 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एका दिवसात 753 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 7 हजार 749 एवढी आहे. 

जळगाव जिल्ह्यात आज 861 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.  जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 28 हजार 172  झाली आहे.  आज 800 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्हात आज 16 कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालाय.