Covid-19 Update : पुन्हा बंधनं, पुन्हा मास्कसक्ती? कोरोना उद्रेकानंतर देशाची आरोग्य यंत्रणा अलर्टवर

ओमायक्रॉनच्या 2 नव्या सब व्हेरिएंटने चिंता वाढवली, देशात पुन्हा नियमावली लागू होण्याची शक्यता, केंद्रीय पातळीवर महत्त्वाची बैठक  

Updated: Dec 21, 2022, 01:43 PM IST
Covid-19 Update : पुन्हा बंधनं, पुन्हा मास्कसक्ती? कोरोना उद्रेकानंतर देशाची आरोग्य यंत्रणा अलर्टवर title=

Corona News Update : चीनमध्ये पुन्हा (Coronavirus in China) एकदा कोरोनाने थैमान घातलं आहे. कोविड-19 (Covid-19) निर्बंध शिथिल केल्यानंतर चीनमध्ये कोरोना विषाणूच्या (Corona) प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. केवळ चीनच नाही तर युरोपसह (Europe) अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. पुढील 90 दिवसांत चीनमधील 60 टक्के आणि पृथ्वीच्या 10 टक्के लोकसंख्येला संसर्ग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ओमायक्रॉनचे नवे 2 व्हेरिएंट
चीनच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रोच्या (Omicron) 2 नव्या सब व्हेरिएंटमुळे चीनमध्ये कोरोनाने पुन्हा हात पाय पसरले आहेत. चीनच्या अनेक शहरातील रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचे बीए.5.2  आणि बीएफ.7 हे सब व्हेरिएंट आढळले आहेत. या दोन व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 

भारताची आरोग्ययंत्रणा अलर्टवर
चीन जपान अमेरिकेत कोरोना संकट पुन्हा वाढतंय. त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत मॅरेथॉन बैठक सुरू आहे. त्यात मास्क सक्तीचा  (Masks Mandatory) निर्णय होण्याची शक्यता आहे. ख्रिसमस आणि नवं वर्ष स्वागत लक्षात घेता ही नियमावली लागू होण्याची शक्यता आहे. देशात पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती लागू होण्याची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे. सार्वजनिक ठिकाणांसह रेल्वे प्रवासातही मास्क सक्ती लागू होण्याची शक्यता आहे.

चीनमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने चीनमधून येणारे प्रवासी, पर्यटक यांच्याबाबत महत्वाचा निर्णय बैठकीत होण्याची शक्यता आहे.  भारत अलर्ट मोडवर असून नागरिकांसाठी काही खबरदारीच्या सूचना देण्यात आल्याचं केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी म्हटलंय. भारतात 220 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाला आहे, पुन्हा एकदा कोरोना भारतात येऊ नये यावर आज केंद्रीय पातळीवर महत्वाची बैठक होणार असल्याचं डॉ. भारती पवार यांनी म्हटलं आहे. 

भारत जोडो यात्रा थांबणार?
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राहुल गांधींना पत्र लिहिलंय. भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं पालन करण्याबाबतची सूचना या पत्रात करण्यात आलीय. एवढंच नाही तर जर कोरोना नियमांचं पालन करता येणार नसेल तर देशहितासाठी भारत जोडो यात्रा स्थगित करण्याचीही सूचना यात करण्यात आलीय. त्यामुळे आता यावरुन राजकारण तापण्याची चिन्हं आहेत...

कोरोना प्रश्नावर विधानसभेत चर्चा
दरम्यान, कोरोनाच्या संकटाबाबत विधानसभेत (Maharashtra Winter Session) आज चर्चा झाली.  कोरोना संदर्भात राज्यात अधिक काळजी घ्यायला हवी, राजकारण बाजूला ठेऊन तात्काळ गांभीर्य लक्षात घ्यावं असं विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलंय. त्यावर कोविड वाढू नये यासाठी तात्काळ टास्कफोर्स (Task Force) तयार करू असं उपमुख्यमंत्री फडणवीस (DCM Devendra Fadanvis) यांनी म्हटलंय. 

ही तीन लक्षणं दिसल्यास व्हा सावध
ओमायक्रॉनचा सब-व्हेरिएंट बीए.5.2 आणि बीएफ.7 हा वेगाने पसरत आहेत. पण दिलासादायक म्हणजे नवा व्हेरिएंट जीवघेणा नाहीए. उपचारानंतर रुग्ण बरे होत असून मृत्यूची संख्या खूप कमी आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या व्हेरिएंटमुळे रुग्णांमध्ये घशाचा त्रास, अंगदुखी आणि अति ताप ही लक्षणं दिसतात.