कोरोनाचा उद्रेक : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात निर्बंध, संचारबंदीसह नवीन नियम लागू

देशात कोरोनाची (Coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन पंजाब (Punjab) सरकारने 1 मार्चपासून नवीन नियम लागू केले आहेत. 

Updated: Feb 23, 2021, 09:33 PM IST
कोरोनाचा उद्रेक : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात निर्बंध, संचारबंदीसह नवीन नियम लागू  title=
Pic Courtesy : PTI

चंदीगड : देशात कोरोनाची (Coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन पंजाब (Punjab) सरकारने 1 मार्चपासून नवीन नियम लागू केले आहेत. तसेच संचारबंदीही लागू केली आहे. जमावबंदीअंतर्गत आता 100 पेक्षा अधिक लोकांना इनडोअर ठिकाणी बंदी घातली गेली आहे. तर मैदानी ठिकाणी 200 लोकांवर ही बंदी घातली गेली. इतकेच नाही तर सरकारने सर्व जिल्हा आयुक्तांना आपापल्या जिल्ह्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट्स शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आवश्यक असल्यास रात्रीच्या कर्फ्यू लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिले निर्देश

मुख्यमंत्री अमरिंदर सिंह (Amarinder Singh) हे पंजाब सरकारच्या उच्चस्तरीय आभासी बैठकीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, कोरोनाव्हायरस पुन्हा वेगाने पसरत आहे. पंजाबमध्ये दररोज 30 हजाराहून अधिक चाचण्या करण्यात येत आहेत. गरज भासल्यास कोरोना हॉटस्पॉट्स असलेल्या भागात नाईट कर्फ्यू लावण्याचे आदेश त्यांनी सर्व जिल्हा आयुक्तांना दिले आहेत. अधिकृतपणे देण्यात आलेल्या माहितीनुसार स्थानिक प्रशासनाला मास्क घालण्याची आणि सामाजिक अंतराचे पालन करण्याचे आदेश काटेकोरपणे लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

1 मार्च रोजी सिनेमा गृहाबाबत निर्णय

अमरिंदर सिंह यांनी स्पष्ट केले, स्थानिक प्रशासनाने कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेवले पाहिजे आणि सिनेमा थिएटर निर्बंधाबाबत 1 मार्च रोजी निर्णय घेण्यात येईल. खासगी कार्यालये आणि रेस्टॉरंट्समध्ये सर्व कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्यात यावी. प्रत्येक कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात आलेल्यांची किमान15 जणांची कोरोना टेस्टिंग अनिवार्य करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचार्‍यांना शंभर टक्के कोरोना लस देण्यात यावी. त्यांनी प्रचार अभियान राबविण्यास मान्यताही दिली. एवढेच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्याची योजना करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. 

यावेळी मुख्य सचिव विनय महाजन म्हणाले की, शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. ते म्हणाले की शाळा खुल्या राहतील. कारण प्रत्येक शाळेत शिक्षकांना कोरोना प्रकरणांबाबत नोडल अधिकारी दिले गेले आहेत, जे त्यांच्या शाळांमध्ये मास्क लावण्याबाबत आणि कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास जबाबदार असतील.