नव्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाबाबत चिंता, पण भारतासाठी हे किती घातक?

कोरोना व्हायरस किती वेगाने पसरतोय?

Updated: Dec 23, 2020, 01:59 PM IST
नव्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाबाबत चिंता, पण भारतासाठी हे किती घातक? title=

मुंबई : जगभरात (SARS-CoV-2) कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ब्रिटनमध्ये पसरत असल्याने जगभरातील अनेक युरोपीय आणि इतर देशांनी यूकेमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. नवीन कोरोना व्हायरसच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर भारताने देखील ब्रिटनवरुन येणारी सर्व उड्डाणे 31 डिसेंबरपर्यंत स्थगित केली आहेत. गेल्या आठवड्यातपासून इंग्लंडमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

यूकेचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी 14 डिसेंबर रोजी हाऊस ऑफ कॉमन्सला सांगितले की, यूकेच्या अधिकाऱ्यांनी जागतिक आरोग्य संघटनेला या प्रकारांबद्दल आधीच सांगितले होते की, 'गेल्या काही दिवसांत आपण कोरोना विषाणूचा नवा प्रकार पाहिला आहे. जो इंग्लंडच्या दक्षिणेत वेगाने पसरत असल्याचे दिसते.'

पब्लिक हेल्थ इंग्लंडने (पीएचई) जाहीर केले की, 13 डिसेंबर रोजी 1,108 नवे रुग्ण आढळले होते. 

भारत सरकारच्या म्हणण्यानुसार ब्रिटनमधील कोरोना विषाणूच्या नव्या रूपाने घाबरून जाण्याची गरज नाही. नीती आयोगाचे सदस्य आणि लसीवरील टास्क फोर्सचे सह-प्रमुख डॉ. व्हीके पॉल यांच्या मते, विषाणूचा नवीन प्रकार वेगाने पसरत आहे. परंतु यामुळे रूग्ण गंभीरपणे आजारी पडतात, रुग्णालयात दाखल होणे किंवा मृत्यू होणे असे कोणतेही उदाहरण पुढे आलेले नाही. त्यांच्या मते, विषाणूच्या स्वरूपामध्ये बदल असूनही, लस आणि त्याच्या वितरण योजनेच्या प्रभावीतेवर परिणाम होणार नाही.'

अलीकडेच बायोटेकने दावा केला आहे की, नवा व्हायरस आला तरी त्यावरील लस ते सहा आठवड्यांत बनवू शकतात. बायोटेकबरोबरच फिझरने असा दावाही केला आहे की, त्यांची लस कोरोना विषाणूच्या नवीन व्हायरसचा सामना करण्यास सक्षम आहे. वास्तविक, कोरोना विषाणूच्या बदललेल्या स्वरूपाबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न उद्भवत आहेत. यातील एक प्रश्न म्हणजे कोरोनाची सध्याची लस कोविड 19 च्या व्हायरसशी लढायला सक्षम आहे की नाही? तज्ञांचे मत आहे की सद्यस्थितीत लस या बदललेल्या रूपात कोरोनाशी लढायला सक्षम आहे.

बायोटेक कंपनीचे सह-संस्थापक यूगर साहिन म्हणतात की, 'वैज्ञानिकदृष्ट्या या लसीची प्रतिकारशक्ती व्हायरसच्या या बदललेल्या प्रकाराला देखील तोंड देण्याची शक्यता आहे.'

एका नवीन अभ्यासानुसार, कोरोनावर मात केल्यानंतर ही त्यांची प्रतिकारशक्ती कमीत कमी आठ महिने संसर्ग टाळण्यास सक्षम असेल. तसे, भारतात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या या बदललेल्या प्रकाराशी संबंधित कोणत्याही रुग्णाची नोंद झालेली नाही. पण हे नाकारता येणार नाही. कारण यूकेमधून भारतात येणार्‍या बर्‍याच लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे.