रात्रभर पत्नीला दिला शॉक; मृत्यू झाला नाही म्हणून... धक्कादायक घटना समोर

Bihar Crime : बिहारमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रात्री पत्नीला मारहाण केल्यानंतर पतीने पत्नीला विजेचा शॉक दिला होता. त्यानंतर त्याचे मन भरले नाही आणि त्याने टोकाचं पाऊल उचललं. यानंतर आरोपीने घर सोडून पळ काढला आहे.

आकाश नेटके | Updated: May 28, 2023, 04:30 PM IST
रात्रभर पत्नीला दिला शॉक; मृत्यू झाला नाही म्हणून... धक्कादायक घटना समोर title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

Crime News : पती पत्नीच्या नात्यात वाद होतच असतात. काही वेळानंतर हे वाद मिटवले देखील जातात. पण काही जण हा राग इतका डोक्यात ठेवतात की त्याचा शेवट करुनच शांत बसतात. शुल्लक वादातून पती पत्नीमधलं भांडण इतकं टोकाला जातं की यामधून भयानक काही घडतं. असाच काहीसा प्रकार बिहारच्या (Bihar Crime) पूर्णीयामध्ये घडलाय. दाम्पत्याच्या वादातून पत्नीने जीव गमावला आहे. पतीने पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. पत्नीच्या हत्येनंतर पती फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Bihar Police) घटनास्थळी प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारच्या पूर्णिया येथील बनमंखी येथे हा धक्कादायक प्रकार घडलाय.पत्नीशी भांडण झाल्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नीचा विजेचा धक्का देऊन आणि गळा आवळून तिचा निर्घृण खून केला आहे. जानकी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाडूगड पंचायतीच्या हटिया टोलीमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पत्नीची रात्री हत्या केल्यानंतर पतीने तिथून पळ काढल्याचे समोर आले आहे. 

"हटिया टोला येथे एका दाम्पत्यामध्ये जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर सकाळी महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. आम्ही तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला आहे. मृत पत्नीच्या अंगावर गळा दाबून मारल्याचे आणि विजेच्या झटक्याच्या खूणा आढळून आल्या आहेत," असे पोलिसांनी सांगितले.

नेमकं काय घडलं?

"रात्री उशिरा पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर पतीने महिलेवर बेदम मारहाण केली. बराच वेळ आरडाओरडा चालू होता. मात्र, आवाज थांबल्याने आम्ही झोपी गेलो. मात्र, सकाळी पती फरार असल्याचे पाहून आम्ही घरात डोकावून पाहिले असता महिला मृतावस्थेत आढळून आली. यानंतर आम्ही पोलिसांना याची माहिती दिली. या प्रकरणी मृत महिलेच्या मामाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.

दुसरीकडे बिहारच्या अररियामध्ये एका महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. शनिवारी संध्याकाळी उशिरा अज्ञाताने कुआडी बाजार येथे एका 40 वर्षीय महिलेचा घरात घुसून गळा चिरला. आरोपीने महिलेच्या पोटात चाकूही खुपसला आणि पळ काढला. मृत मुशर्रत बेगम या शमशाद यांच्या पत्नी होत्या. पती शमशाद बाजारात गेला होता तेव्हा हा सर्व प्रकार घडला. शमशादने सांगितले की,  बाजारातून आल्यानंतर घरात गेल्यावर स्वयंपाकघरात पत्नीचा रक्ताने माखलेला मृतदेह दिसला. त्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली.