अण्णा हजारेंचा पुन्हा एल्गार, डिसेंबरपासून आंदोलन

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे. जनलोकपाल कायद्यासाठी ते पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. यासाठी ७-८ ऑक्टोबरला अण्णांची राळेगणसिद्धी येथे समर्थकांची बैठक बोलवली आहे.

Updated: Oct 2, 2017, 07:02 PM IST
 अण्णा हजारेंचा पुन्हा एल्गार, डिसेंबरपासून आंदोलन title=

नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे. जनलोकपाल कायद्यासाठी ते पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. यासाठी ७-८ ऑक्टोबरला अण्णांची राळेगणसिद्धी येथे समर्थकांची बैठक बोलवली आहे.

अण्णांची दावा केलाय की, ते यावर्षाच्या शेवटी आंदोलन करतील. सोमवारी अण्णा हजारे राजघाटावर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त बापूंच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आले होते. अण्णा गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून लोकपालची अंमलबजावणी, शेतीमालाला योग्य भाव आणि स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी याकडे लक्ष देण्याची मागणी करतायत. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून अण्णांना याबाबत प्रतिसाद मिळत नसल्यानं अण्णा पुन्हा एकदा आंदोलन पुकारणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी घोषणा केली.  

पत्रकारांशी बोलताना अण्णा म्हणाले की, ‘तीन वर्षाआधी देशातील नागरिकांनी मोठ्या आशेने भाजपला मत दिले होते. लोकांना वाटलं होतं की, भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी लोकपाल आणि लोकायुक्तांची नियुक्ती होईल. काळधन ३० दिवसात परत येईल. शेतक-यांच्या आत्महत्या थांबतील. मात्र गेल्या तीन वर्षात काहीच बदल झाला नाही. बदल केवळ सत्तेत झाला आहे’.