Lockdown : कोरोनामुळं बद्री-केदारनाथ मंदिरांकडून घेतला गेला मोठा निर्णय

यंदाच्या चारधाम यात्रेला गालबोट कोरोनाचं...   

Updated: Apr 20, 2020, 03:13 PM IST
Lockdown : कोरोनामुळं बद्री-केदारनाथ मंदिरांकडून घेतला गेला मोठा निर्णय  title=
छाया सौजन्य- एएनआय

नवी दिल्ली : चारधाम यात्रेतील अत्यंत महत्त्वाची अशी केदारानथ आणि बद्रीनाथ मंदिरं येत्या काळात नेमकी कोणत्या तारखेला उघडणार याचीच उत्सुकता अनेकांना होती. Coronavirus कोरोना विषाणूचं देसभरात सुरु असणारं थैमान पाहता या पार्श्वभूमीवर आता याचे थेट पडसाद हे चारधाम यात्रेवर दिसून येऊ लागले आहेत. ज्यामुळे आता बद्रीनाथ आणि केदारनाथ या दोन्ही मंदिरांकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

हा निर्णय आहे, मंदिराची कवाडं उघडण्याच्या तारखांचा. नव्या निर्णयानुसार बद्रीनाथ मंदिराची कवाडं आता १५ मे रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास उघडणार आहेत. तर, केदारनाथ मंदिराचे द्वार हे एक दिवस आधी, म्हणजेच १४ मे रोजी उघडणार आहेत. दरम्यान, गंगोत्री आणि यमुनोत्रीधाम ठरलेल्या तारखांनाच म्हणजे २६ एप्रिललाच खुले होणार आहेत. 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालाधी आणखी वाढवण्यात आला. ज्यानुसार आता ३ मे रोजी देशातील ल़ॉकडाऊन शिथिल केला जाणार असल्याचं सांगण्यात आलं. ज्यामुळेच बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरांचे द्वार उघडण्याच्या तारखाही बदलण्यात आल्या. 

 

हा निर्णय येण्यापूर्वी, बद्रीनाथ मंदिराची कवाडं ३० एप्रिल रोजी ब्रह्म मुहूर्तावर सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास भाविकांसाठी खुली होणार होती. पण, कोरोनाचं एकंदर सावट पाहता, चारधान यात्रेशी संबंधित हे महत्त्वाचे निर्णय मंदिर प्रशासनाला घ्यावेच लागले.