Kantara पाहिला? आता जाणून घ्या त्याच्या Climax चा अर्थ

कांतारा चित्रपट पाहिला असेल आणि त्याच्या अखेरच्या दृश्याबाबत प्रश्न पडले असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर... जाणून घ्या एका अद्वितीय कलाकृतीबाबत बरंच काही   

Updated: Oct 31, 2022, 08:38 AM IST
Kantara पाहिला? आता जाणून घ्या त्याच्या Climax चा अर्थ  title=
watched kantara movie climax know the meaning behind that worldwide collection

Kantara Rewiew : 'कांतारा'..... सध्या कलाजगतामध्ये याच एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रटातील कलाकारांपासून ते अगदी त्यातील गाणी आणि कथानकापर्यंत प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं. जागतिक स्तरावर या चित्रपटाती कमाई आता 250 कोटींच्या घरात पोहोचली आहे (Kantara box office collection). अवघ्या 15 कोटी रुपयांच्या निर्मिती खर्चासह साकारण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये लेखन, दिग्दर्शन आणि मुख्य अभिनेता अशी तिहेरी भूमिका ऋषभ शेट्टी (rishabh shetty) यानं निभावली आणि पाहता पाहता तो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाला. 

साधारण सहा महिने चित्रपटासाठी मेहनत घेणाऱ्या ऋषभनं एक अशी कलाकृती आणि एक अशी प्रथा सर्वांसमोर आणली जिथं निसर्ग आणि मानवामध्ये असणारं नातं आणि या नात्यातील दुवा म्हणजेच 'दैवा'वर भाष्य करण्यात आलं. 

आता हे दैव काय? तर ज्यांनी 'कांतारा' (Kantara climax) हा चित्रपट पाहिला असेल, तर त्यांच्यासाठी या चित्रपटातील काही संकल्पना ओळखीच्या असतील आणि ज्यांनी चित्रपट पाहिला नसेल, तर त्यांनी तो पाहावा हे सांगण्यावाचून पर्याय नाही. 

अधिक वाचा : 'कांतारा' आधी ऋषभ शेट्टी करायचा हे काम, जाणून बसेल धक्का

'कांतारा' पाहून बाहेर पडल्यानंतर काही प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित झाला आहे. तो म्हणजे मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या 'शिवा'चं काय होतं? तर, 'गुरवा'च्या निधनानंतर परिस्थिती इतकी बिघडते की, जमीनदाराचं पितळ उघडं पडतं. त्याच्या सर्व अपराधांचा पाढा गावकऱ्यांपुढे वाचला जातो आणि तिथे 'शिवा' आपल्या भावाच्या हत्येचा सूड़ उगवण्यासाठी पेटून उठतो. 

संघर्ष होतो, आगीचे लोट उठतात, अनेकांचे बळी जातात. शिवाचेही प्राण पणाला लागतात. पण, तो अखेरच्या घटका मोजत असतानाच त्याच्या शरीरात दैव संचारतो आणि दानवी वृत्तींचा, व्यक्तींचा तो नाश करतो. पुढे दैव अर्थात देवतांच्या सेवेचा मान हा शिवालाच मिळतो. आपल्या शरीरात असणाऱ्या या अनोख्या उर्जेची त्याला जाणीव होते आणि यामुळं तो आपल्या माणसांची जबाबदारी वन अधिकाऱ्यांच्या हाती सोपवतो आणि वनात निघून जातो. 

वनामध्ये जात असताना असंख्य किंकाळ्या कानांवर पडतात आणि आक्रोश ऐकू येतात. पण हे आक्रोश असतात दिलासा मिळाल्याचे. एका मुलाला वडीलांची भेट घडल्याचे आणि आपल्या माणसांसाठी शिवानं केलेल्या आपल्या आयुष्याच्या त्यागाचे. 'कांतारा'चा शेवट म्हणजे एक वर्तुळ पूर्ण होण्याचे संकेत, असाच त्याचा अर्थ. तीन शब्दांमध्ये सांगावं तर त्याग, संघर्ष आणि समाधान हाच चित्रपटाच्या अखेरच्या दृश्याचा सारांश.