'Show Must Go On...माझ्या बाबांनी प्रत्येक काम मन लावून केलं'

वयाच्या ८१ व्या वर्षी झालं निधन 

Updated: May 18, 2020, 08:22 AM IST
'Show Must Go On...माझ्या बाबांनी प्रत्येक काम मन लावून केलं' title=

मुंबई : ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी यांच निधन झालं आहे. त्यांच्या जाण्यामुळे रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. रत्नाकर मतकरी यांच वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं. १७ मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास रत्नाकर मतकरींच निधन झालं.  १७ मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास कोरोनामुळे निधन झालं. 

रत्नाकर मतकरी यांच्या मुलीने सुप्रिया विनोद दोन मे रोजी एक फेसबुक पोस्ट शेअर केली होती. यामधून रत्नाकर मतकरी यांचा साधेपणा सहज दिसून येतो. लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण घरीच आहे. अशावेळी घरातील कामांना मदत केली जातेय. रत्नाकर मतकरी देखील कडवे वाल सोलून देतानाची ही पोस्ट आहे. काम कोणतंही असो त्यामध्ये रत्नाकर मतकरी एकाग्र होऊन ते कम करत असतं. लेखनासोबत ते घरकामातही मदत करतात. हे एक वेगळं चित्र मांडणारी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. 

(ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरींचं निधन) 

 

रत्नाकर मतकरी आपल्या पत्नीला कडवे वाल सो़लून देतानाचा फोटो त्यांच्या मुलीने शेअर केला आहे. यामध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट रत्नाकर मतकरी कवडे वाल सोलताना किती एकाग्र आहेत हे या पोस्ट मधून दिसून येतंय. त्यांनी लिहिलं आहे की,'माझे परफेक्शनिस्ट बाबा उसळीसाठी( किंवा बिरडयासाठी म्हणा) कडवे वाल सोलताना ! ' show must go on ' या रंगभूमीच्या नियमासाठी ,गरज असेल तेव्हा सगळं करायचं आणि तेही पूर्ण मन लावुन  या त्यांच्या सिद्धांता प्रमाणे ते आता लेखनासोबत सर्व घरकाम करतात - मुख्य म्हणजे ते करतात त्या कामांसाठी आईकडून त्यांनी प्रशस्तीपत्रकही मिळविले आहे !! so sweet to see u in this role baba '

माझे परफेक्शनिस्ट बाबा उसळीसाठी( किंवा बिरडयासाठी म्हणा) कडवे वाल सोलताना ! ' show must go on ' या रंगभूमीच्या नियमासाठी...

Posted by Supriya Vinod on Saturday, May 2, 2020

१९५५ मधे, वयाच्या सतराव्या वर्षी, त्यांची ‘वेडी माणसं’ ही एकांकिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन प्रकाशित झाली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांचे लेखन अव्याहतपणे चालू होते. मतकरींची ‘लोककथा ७८’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा ‘, आणि इतर अनेक नाटके नाट्य रसिकांच्या मनात कायम घर करुन आहेत. अलीकडेच ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा, शिम्मा राक्षस’ या मुलांच्या, तसच महाभारतातल्या अंतिम पर्वावर आधारीत ‘आरण्यक’ या नाटकांनी रंगभूमी गाजवून सोडली. वास्तवाचे भान देणाऱ्या गूढकथा हा कथाप्रकार त्यांनी एकहाती वाचकांपर्यंत पोचवला.

मोठ्यांसाठी सत्तर तर मुलांसाठी बावीस नाटकं, अनेक एकांकिका, वीस कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेख संग्रह, आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’ अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे. ‘गहीरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या मालिका, तसच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट ‘इन्वेस्टमेन्ट’, अशी त्यांची इतर माध्यमामधली कामंही रसिकप्रिय ठरली आहेत. रत्नाकर मतकरींना विपुल पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत.

संगीत नाटक अकादेमी आणि साहित्य ॲकेडमी या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कारप्राप्त ठरलेल्या मोजक्या व्यक्तीमत्वात त्यांचा समावेश होतो. रत्नाकर मतकरींच्या पश्चात निर्मिती आणि अभिनयाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी, कन्या अभिनेत्री सुप्रिया विनोद, पुत्र लेखक/समीक्षक गणेश मतकरी, जावई डाॅ. मिलिंद विनोद, स्नुशा आर्किटेक्ट पल्लवी मतकरी आणि नातवंडे, असा परिवार आहे. मतकरींच्या जाण्याने साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रात एक न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.