'वाघनखं आणताय अभिनंदन, पण जमलं तर तेवढं...', नाना पाटेकर यांचे सरकारला चिमटे!

Nana Patekar On Sudhir Mungantiwar :  सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात वाघनखांची (WaghNakh) चर्चा होताना दिसतेय. याच मुद्द्यावरून आता प्रसिद्ध मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य सरकारला कोपरखळी लगावली आहे.

Updated: Sep 9, 2023, 06:25 PM IST
'वाघनखं आणताय अभिनंदन, पण जमलं तर तेवढं...', नाना पाटेकर यांचे सरकारला चिमटे! title=
Nana Patekar Sudhir Mungantiwar

Nana Patekar Over WaghNakh : अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या शोर्याचं प्रतिक असलेल्या वाघनखांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे. वाघनखं भारतात आणण्यासाठी राज्य सरकारने (Maharastra Govt) हालचाली सुरू केल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिलीये. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात वाघनखांची चर्चा होताना दिसतेय. याच मुद्द्यावरून आता प्रसिद्ध मराठी अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी राज्य सरकारला कोपरखळी लगावली आहे. वाघनखांचा उल्लेख करत नानांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सुधीर मुनगंटीवार यांना चिमटे काढले आहेत. 

नेमकं काय म्हणाले नाना?

सुधीर मुनगंटीवार, महाराजांची वाघनखं आणताय त्याबद्दल अभिनंदन! पण जमलं तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पहा, असा टोला नाना पाटेकर यांनी लगावला आहे. नाना पाटेकर यांनी ट्विट करत सरकारला खडेबोल सुनावले आहेत. त्यामुळे त्यांचं ट्विट सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचं पहायला मिळतंय.

पाहा ट्विट

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता, आता याच वाघनखांनी भ्रष्टाचाराचा समाचार घ्या, असा सल्ला पाटेकर यांनी सरकारला दिलाय. त्यामुळे आता सरकार यावर कोणती प्रतिक्रिया देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ज्यादिवशी शिवरायांनी अफझलखानाचा वध घेतला, त्याचदिवशी हा ऐतिहासिक, अमूल्य ठेवा मुंबईत आणण्यासाठी सरकार ब्रिटनसोबत सामंजस्य करार करणार आहे, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी झी 24 तासशी बोलताना दिली होती.

आणखी वाचा - शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी पोहोचली? वाचा न ऐकलेला इतिहास!

दरम्यान, वाघनखं पुन्हा भारतात आणण्यासाठी सुमारे 50 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ब्रिटिश प्रशासनाने वाघनखं भारताला सुपूर्द करण्यास मान्यता दिली आहे. सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहे. 1824 मध्ये ब्रिटीश अधिकारी जेम्स ग्रँड डफ याने वाघनखं ब्रिटनला नेली होती. त्यानंतर आता शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारसाचा ठेवा महाराष्ट्रात आणला जावा, अशी मागणी केली जात होती.