तालिबानकडून सरकार स्थापनेची घोषणा, काबूलमधून व्यवसायिक उड्डाणांवर बंदी

काबूलमधील 11 जिल्ह्यांवर वर्चस्व प्रस्थिपित केल्यानंतर तालिबानने सर्व व्यवसायिक उड्डाणांवर बंदी आणली आहे. 

Updated: Aug 16, 2021, 07:03 AM IST
तालिबानकडून सरकार स्थापनेची घोषणा, काबूलमधून व्यवसायिक उड्डाणांवर बंदी title=

काबूल : अफगाणिस्तानवर पुर्णपणे कब्जा केल्यानंतर तालिबान बंडखोरांनी रविवारी मध्यरात्री सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तालिबान बंडखोरांच्या या घोषणेनंतर जगातील सर्वच देश सतर्क झाले आहेत. एवढंच नाही तर अफगाणिस्थानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना आणि दूतावासांतील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे नियोजन सुरू केले आहे. ब्रिटनबद्दल बोलायचं झालं तर तेथील खासदारांना सुट्ट्यांवरून  परत बोलावण्यात आलं आहे कारण अफगाणिस्तानमधील बिघडलेल्या परिस्थितीवर संसदेत चर्चा होऊ शकेल.

मिळालेल्या  माहितीनुसार, तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलकडे कूच केल्याने पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रविवारी आपल्या मंत्रिमंडळाच्या आपत्कालीन समितीची बैठक बोलावली. महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी 11 सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर इतर नाटो फौजांप्रमाणे ब्रिटननेही आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली.

काबूलहून व्यवसायिक उड्डाणांवर बंदी
काबूलमधील 11 जिल्ह्यांवर वर्चस्व प्रस्थिपित केल्यानंतर तालिबानने सर्व व्यवसायिक उड्डाणांवर बंदी आणली आहे. त्याचबरोबर विमानतळावर उपस्थित असलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लष्कराची विमाने मदतीसाठी पोहोचले आहेत. अमेरिकेच्या एका लष्करी अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

शांततेत सत्ताबदल करण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. तालिबानी आणि अफगाण सरकार प्रतिनिधी यांच्यात चर्चा सुरू आहे. दरम्यान, विविध देशांनी आपल्या नागरिकांना सुरक्षिततस्थळी हलवण्यासाठी हालचाली सुरू केल्यात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 129 भारतीय नागरिकांना दिल्लीमध्ये सुरक्षित आणण्याची मोहीम राबवली जात आहे. 

भारतानं काबूलमधील दुतावास अद्याप बंद केलेला नाही. भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी नियोजन करत असल्याची माहिती भारतीय दुतावासातील सूत्रांनी दिली आहे.