पाकिस्तानवर महागाईचं संकट, आल्याचा दर ऐकून तुम्हालाही धक्का बसेल !

 भाजीपाला खरेदी करताना देखील नागरिकांना शंभर वेळा विचार करावा लागतोय. 

Updated: Dec 16, 2020, 09:34 AM IST
पाकिस्तानवर महागाईचं संकट, आल्याचा दर ऐकून तुम्हालाही धक्का बसेल ! title=

इस्लामाबाद : इम्रान खान (Imran Khan) यांच्या 'नव्या पाकिस्तान' मध्ये महागाईचा दर इतका वाढलाय की भाजीपाला खरेदी करताना देखील नागरिकांना शंभर वेळा विचार करावा लागतोय. रावळपिंडी येथे एक किलो आल्याची किंमत १ हजार रुपये आहे. तर शिमला मिर्चीची किंमत २०० रुपये प्रति किलो आहे. इम्रान खान यांची पूर्व पत्नी रेहम खान यांनी एका न्यूज चॅनलचा व्हिडीओ ट्वीट केला आणि पाकिस्तानमधील वाढत्या महागाईला इम्रान खान यांना जबाबदार धरले.

चुकीच्या निर्णयांचा परिणाम 

इम्रान खान यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा परिणाम पाकिस्तानी जनतेला सहन करावा लागत असल्याचे म्हटलं जातंय. आलं, शिमला मिर्चीपासून सर्व भाज्यांचे दर गगनाला भिडलेयत. असे असले तरीही इम्रान खान सरकार स्वत: आपली पाठ थोपाटताना दिसतंय. साखरेचे दर कमी होणे हे सरकार आपले यश असल्याचं सांगतंय. पण पाकिस्तानी नागरिकांना रोजच्या भाज्यासाठी खिसा अधिक खाली करावा लागतोय.

इम्रान खान गप्प 

देशात साखर ८१ रुपयांनी विकली जात असल्याचे विधान इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. सरकारच्या योग्य रणनितीमुळे १०२ रुपयांनी विकली जाणारी साखर ८१रुपयांमध्ये विकली जातेय. पाकिस्तानात महागाई वाढत असली तर इम्रान खान या सर्व प्रकरणांवर शांत दिसतात. 

पाकिस्तानमध्ये गहुंच्या किंमतींनी सर्व रेकॉर्ड तोडलेयत. काही दिवसांपूर्वी पिठाच्या किंमती वाढल्याने पाकिस्तानात गोंधळ निर्माण झाला होता. इम्रान खान यांच्या चुकीच्या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये महागाई वाढत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या डिसेंबरमध्ये गहूची किंमत २००० रुपये प्रति ४० किलो होती. यावर्षी ऑक्टोबरमध्ये हा रोकॉर्ड तोडला.