'वेळ आणि जागा पाहून भारताला उत्तर देऊ'

भारताने या हल्ल्याविषयी अधिकृत माहिती दिल्यानंतर पाकिस्तानकडून हा इशारा देण्यात आला

Updated: Feb 26, 2019, 05:24 PM IST
'वेळ आणि जागा पाहून भारताला उत्तर देऊ' title=

नवी दिल्ली : India Strikes Back  भारतीय वायुदलाकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या कारवाईचे पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली आहे. पुलवामा हल्ल्याचं उत्तर देत भारतीय वायुदलाने मंगळवारी म्हणजेच २६ फेब्रुवारीला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास बालाकोटा येथील जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला केला. या हल्ल्यात संपूर्ण दहशतवादी तळच उध्वस्त झालं. भारताकडून करण्यात आलेल्या या कारवाईनंतर पाकिस्तानला खडबडून जाग आली, ज्यानंतर तेथे तातडीने मंत्रीमंडळाची आपातकालीन बैठकही बोलवण्यात आली. ज्या बैठकीनंतर पाकिस्तनचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला या हल्ल्याचं उत्तर देणार असल्याचा इशारा दिला. 

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवांनी पत्रकार परिषदेत या हल्ल्याविषयी अधिकृत माहिती दिल्यानंतर पाकिस्तानकडून हा इशारा देण्यात आला. या हल्ल्याची सुरुवात भारताने केली असून, आता योग्य ती वेळ आणि ठिकाण पाहून उत्तर देऊ असं पाकिस्तानकडून अधिकृतपणे सांगण्यात आलं. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, सैन्यदल प्रमुख आणि खुद्द पंतप्रधान यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी जनतेला येणाऱ्या काही घटनांसाठी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. 

बालाकोटमध्ये भारतीय वायुदलाकडून केलेला हल्ला, दहशतवादी तळांचा नायनाट आणि त्याविषयीचे सर्व दावे पाकिस्तानने फेटाळून लावले असून, भारताच्या या कृतीविषयी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सोबतच स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांना भारत ज्या ठिकाणी हल्ला केल्याचा दावा करत आहे, त्या ठिकाणी नेण्याची तयारीही पाकिस्तानकडून दाखवण्यात आली आहे.