या सवयींमुळे तुमचं रिलेशनशिप येऊ शकतं धोक्यात!

 रिलेशनशिप टिकवण्यासाठी आजकाल अनेकांना चांगलीच कसरत करावी लागते. 

Updated: Nov 17, 2018, 12:33 AM IST
या सवयींमुळे तुमचं रिलेशनशिप येऊ शकतं धोक्यात! title=

मुंबई : रिलेशनशिप टिकवण्यासाठी आजकाल अनेकांना चांगलीच कसरत करावी लागते. प्रेमाच्या नात्यात किंवा लग्नाच्या नात्यात अनेक अडचणींचा सामना अनेकांना करावा लागतो. व्यक्तींमधील अनेक सवयी याला अनेकदा कारणीभूत असतात.

तुमच्या सवयी जर चुकीच्या असतील किंवा तुमच्याशीच केंद्रीत असतील तर तुमचं रिलेशनशिप धोक्यात आहे, असं समजा. अशाच काही सवयींची माहिती आम्ही तुम्हाला करून देत आहोत, ज्यामुळे तुमचं नातं धोक्यात येऊ शकतं किंवा तुम्ही कुणासोबतही रिलेशनमध्ये राहू शकत नाहीत. या सवयी केवळ पुरुषांमध्येच असतात, असं नाहीतर या सवयी महिलांमध्येही बघायला मिळतात. 

१) स्वत:वर जास्त प्रेम करणे -

अनेक वर्ष एकटे राहिल्यानेही असं होऊ शकतं. तुम्हाला स्वत:वर जास्त प्रेम असतं. तुमच्यासोबत कितीही चांगला, कितीही सुंदर, कितीही हुशार व्यक्ती असला तरी तुम्हाला दुस-याचं काहीच वाटत नाही. तुम्ही स्वत:मध्येच गुंग असता. मी या शब्दापलिकडे तुम्ही कधीही बघत नसाल, तर तुम्ही खूप मोठी चूक करताय. मी पणा हा मनुष्याचा मोठा शत्रू आहे. जर तो तुमच्यात असेल तर तुम्ही कधीही कुणासोबत रिलेशनमध्ये राहू शकणार नाहीत. तुमच्याशी कुणालाही नातं जोडावं वाटणार नाही. कारण तुम्हाला समोरच्या व्यक्तीपेक्षा स्वत:त जास्त रस आहे. 

२) कमिटमेंटची भीती वाटणे -

कोणत्याही नात्यात काही वेळानंतर कमिटमेंट तर करावीच लागते. कारण कमिटमेंटशिवाय नात्याचं काहीच भविष्य नाहीये. अशात जर तुम्ही कमिटमेंट करण्यापासून दूर पळत असाल तर तुमच्या साथीदाराच्या मनात तुमच्याविषयी अविश्वास वाटू शकतो. काही दिवसात तो तुम्हाला सोडू शकतो. कमिटमेंट न करणं किंवा त्यापासून दूर पळणं हे नात्याला संपवतं. अशात एकतर साथीदारासोबत कमिटमेंट करा नाहीतर एकटे रहा. 

३) स्वातंत्र्य - 

जोपर्यंत तुम्ही सिंगल असता तोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाने काहीही करू शकता. कुणीही तुम्हाला काहीही म्हणनार नाही. पण तेच जर तुम्ही एखाद्या नात्यात असाल किंवा तुम्ही कुणाच्या प्रेमात असाल तर त्यांच्याकडून तुम्हाला अनेक गोष्टींची विचारणा होऊ शकते. प्रत्येक गोष्टीला अडसरही केला जाऊ शकतो. अशात जर तुम्हाला स्वत:त काहीही बदल करायचा नाहीये, तुम्ही तुमच्या स्वातंत्र्यात मश्गूल असाल तर तुम्ही रिलेशनमध्ये राहू शकत नाही.

४) जोडीदारापेक्षा फोनमध्ये जास्त लक्ष -

अलिकडे हे प्रमाण खूप वाढलंय. अनेकजण जोडीदारापेक्षा मोबाईल फोनमध्ये डोकं घालून बसलेले असतात. बायका मोबाईलला त्यांची सवत समजायला लागल्या आहेत. कारण त्यांचे पती २४ तास मोबाईलला चिकटलेले असतात. असंच तुमच्याही नात्यात होऊ शकतं. तुम्ही गर्लफ्रेन्ड किंवा बॉयफ्रेंड तुमच्यासोबत असूनही तुम्ही मोबाईलमध्ये व्यस्त असाल तर तुमचं रिलेशन धोक्यात आहे.

५) मित्रांसोबत जास्त मिळतो आनंद - 

अनेकजण असे असतात, ज्यांना एका व्यक्तीच्या नात्यात बांधल्या जाण्यापेक्षा दोस्तांच्या गराड्यात राहण्यात जास्त आनंद असतो. मित्रांसोबत कुठेही जायला तुम्ही एका पायावर उभे असता. पण जर तेच तुमच्या जोडीदारासोबत कुठे जायचं म्हटल्यावर तुमच्या जीवावर येत असेल तर तुम्ही आधीच सावध व्हा. तुमच्या जोडीदारालाही वेळ देणं हे तुमचं कर्तव्य आहे.

६) नेहमी आपलंच सांगणं -

जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात तर, अर्थातच तुम्ही जितक्यात तुमच्या गोष्टी शेअर करता तेवढ्याच गोष्टी तुमच्या जोडीदारालाही शेअर कराव्या वाटत असेलच. पण केवळ तुम्ही तुमचीच पिपाणी वाजवत राहिले तर, या नात्यात संवाद कसा होईल. दुस-याचंही ऎकून घेण्याची तुमची तयारी हवी. दुस-यांचं ऎकणं आणि ते समजणं हे खूप महत्वाच आहे. जर तुम्ही असं करत नसाल तर तुम्ही रिलेशनमध्ये राहू शकत नाही.

७) बेजबाबदार वागणं -

तुमचा बेजबाबदारपणा तुम्हाला एकटं पाडू शकतो. जर तुम्ही स्वत:वर लक्ष देत नसाल तर तुमच्याकडे कुणालाही तुम्ही आकर्षित करू शकणार नाही. तसंच जर तुम्ही जबाबदार नसाल तर एका व्यक्ती, त्या व्यक्तीच्या गरजांची जबाबदारी कशी पेलणार…? त्यामुळे जर तुम्ही बेजबाबदार असाल तर तुम्ही एकटेच राहणार….नाहीतर तुमचं नातं तुटणार….