पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण

चाकण आणि राजगुरुनगरमध्ये वाहनांची जाळपोळ

Updated: Jul 30, 2018, 11:24 PM IST
पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण title=

पुणे: आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या मराठा आंदोलनाची धग दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नवी मुंबई, ठाणे आणि मराठवाड्यापाठोपाठ सोमवारी पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी भीमाशंकरला जाणाऱ्या एका बसवर हल्ला केला. यामध्ये एक गरोदर महिला जखमी झाली आहे. त्यामुळे सध्या चाकणमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चाकणमध्ये सध्या जमावबंदीचे कलम १४४ लागू केले आहे. 

ठळक घडामोडी

7.50 पुण्यातील एसटी वाहतूक दुपारपासून ठप्प
6.41 आंदोलकांनी एसटी बस पेटवली
6.40 राजगुरुनगरमध्ये आंदोलन पेटलं, आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक
6.20 पेटलेली वाहने विझविण्याचे काम सुरु
6.00 शहरातील वाहतूक सुरु करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु
5.56: विश्वास नांगरे-पाटील चाकणमध्ये दाखल, परिस्थिती काहीप्रमाणात नियंत्रणात
मावळमध्ये आंदोलकांची जाळपोळ आणि शांततेचे आवाहन
* चाकणमध्ये आंदोलकांनी बस स्थानक आणि पोलीस चौकी पेटवली
आळंदी परिसरातही आंदोलनाला हिंसक वळण
* पोलिसांकडून चाकणमध्ये जमावबंदीचे १४४ कलम लागू
* चाकणमध्ये बसवर आंदोलकांचा हल्ला, गर्भवती महिला जखमी

याशिवाय, पिंपरीतही आंदोलनाने उग्र स्वरुप धारण केले आहे. ताज्या माहितीनुसार याठिकाणी जमावाने जवळपास ५० ते ६० वाहनांची तोडफोड व जाळपोळ केली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. सध्या पोलिसांकडून आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. या आंदोलनामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
   
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मराठा समाजाच्या प्रतिनिधींना सह्याद्री अतिथीगृहावर चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, सकल मराठा क्रांती मोर्चाचा एकही प्रतिनिधी तिकडे फिरकला नाही. मराठा समाजाने यापूर्वीच आपल्या मागण्याचे निवेदन सरकारला दिले आहे. त्यामुळे आता मराठा समाजातील कोणत्याही व्यक्ती किंवा पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु नये, अशी भूमिका लातूरमधील मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आली.