भारतासाठीचा सर्वात Unlucky Umpire पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा पंच; त्याचा इतिहास पाहाच

World Cup 2023 India Vs Pakistan Unlucky Umpire For Men In Blue: भारत आणि पाकिस्तानदरम्यान 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 26, 2023, 02:30 PM IST
भारतासाठीचा सर्वात Unlucky Umpire पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा पंच; त्याचा इतिहास पाहाच title=
भारत पाकिस्तानदरम्यानच्या सामन्यासाठीचे पंच म्हणून पाहणार काम

World Cup 2023 India Vs Pakistan Unlucky Umpire For Men In Blue: भारतात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून होणार आहे. या स्पर्धेमध्ये भारताचा सामना 14 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये झालेल्या 2 सामन्यांपैकी पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. तर 'सुपर फोर'च्या टप्प्यात झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 238 धावांनी पराभूत केलं. आता पुन्हा एकदा हे दोन्ही संघ आमने-सामने येणार असून या सामन्यातील पंचांची घोषणा आयसीसीने केली आहे. भारतीय चाहत्यांसाठी चिंतेची बाब म्हणजे यामध्ये अशा एका पंचाचा समावेस आहे. जो भारतासाठी फारसा फायद्याचा ठरत नाही, म्हणजेच जो टीम इंडियासाठी अनलकी मानला जातो.

भारत-पाक सामन्यातील पंच कोण?

वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या सामन्याचा निकाल हा मैदानावर असलेले 2 पंच आणि टीव्ही पंचांच्या निर्णयावरही अवलंबून असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मैदानावरील बाद की नाबाद हे निकाल इंग्लंडचे पंच रिचर्स इलिंगवर्थ आणि दक्षिण आफ्रिकेचे पंच माराइस इरासमस देतील. तर तिसरे पंच म्हणून इंग्लंडचे रिचर्ड कॅटलबोरेफ जबाबदारी पाहतील असं आयसीसीने स्पष्ट केलं आहे.

का म्हटलं जातं त्यांना अनलकी अंपायर

मूळचे इंग्लंडचे असलेले रिचर्ड कॅटलबोरेफ हे भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यामध्ये तिसरे पंच असणं हे भारतासाठी टेन्शनचं ठरणार आहे. भारतासंदर्भातील कोणत्याही सामन्यामध्ये रिचर्ड कॅटलबोरेफ यांनी पंच म्हणून कामगिरी पाहिली आहे ते सामने भारताला लाभदायक ठरलेले नाहीत. 2014 मध्ये भारतीय संघाला टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये पराभवाचं तोंड पहावं लागलं होतं. तर 2015 मध्ये एकदिवसीय सामन्याच्या वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीच्या सामन्यातही भारत पराभूत होऊन बाहेर पडला होता. या दोन्ही सामन्यांमध्ये रिचर्ड कॅटलबोरेफ हेच पंच होतं.

इथंही सापडतं त्यांचं नकोसं कनेक्शन

त्यानंतर सन 2016 च्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्यफेरीमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला होता. या सामन्याचाही संबंध थेट रिचर्ड कॅटलबोरेफ यांच्याशी असून तेच या सामन्यात पंच होते. 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारताला पराभूत करत जेतेपद पटकावलं होतं. 2019 साली न्यूझीलंडचे वर्ल्डकपच्या ज्या उपांत्यफेरीमध्ये भारताला पराभूत केलं होतं त्यामध्येही पंच म्हणून रिचर्ड कॅटलबोरेफच काम पाहत होते.