Asia Cup 2022 Womens: आशिया कप स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक, पाकिस्तान की श्रीलंका कोण भिडणार?

आशिया कप 2022 वुमन्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघानं धडक मारली आहे. भारतानं उपांत्य फेरीत (Team India) थायलँड संघाचा (Team Thailand) 74 धावांनी पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली. 

Updated: Oct 13, 2022, 12:55 PM IST
Asia Cup 2022 Womens: आशिया कप स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक, पाकिस्तान की श्रीलंका कोण भिडणार? title=

Asia Cup 2022 Womens India Final:  आशिया कप 2022 वुमन्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघानं धडक मारली आहे. भारतानं उपांत्य फेरीत (Team India) थायलँड संघाचा (Team Thailand) 74 धावांनी पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीच्या सामन्यात थायलँडनं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतानं प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 6 गडी गमवून 148 धावा केल्या आणि विजयासाठी 149 धावांचं आव्हान दिलं. थायलँड संघ 20 षटकात 9 गडी गमवून 74 धावाच करू शकला. अंतिम फेरीत भारताचा सामना (Team India In Final) श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन संघातील विजयी संघाशी होणार आहे. 

भारताचा डाव

फलंदाजीला मैदानात उतरलेल्या शफाली वर्मा (Shafali Varma) आणि स्मृती मनधाना (Smriti Mandhana) यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 38 धावांची भागीदारी केली. मात्र स्मृती मनधाना वैयक्तित 13 धावांवर असताना तंबूत परतली. त्यानंतर शफाली वर्मानं आपली आक्रमक खेळी सुरूच ठेवली. तिने 28 चेंडूत 42 धावा केल्या. या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. शफालीनं सॉर्ननरीन टिपॉचच्या गोलंदाजीवर फटका मारला मात्र चैवईने झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर हरमनप्रीत कौरनं जेमिमाह रॉड्रिक्ससोबत संघाची बाजू सावरली. संघाची धावसंख्या 109 असताना रॉड्रिक्स बाद झाली. तिने 26 चेंडूत 27 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेली रिचा घोषही जास्त काळ तग धरू शकली नाही आणि अवघ्या 2 धावा करून बाद झाली. संघाच्या 132 धावा असतानाा हरमनप्रीत कौर बाद झाली. तिने 30 चेंडूत 36 धावा केल्या. या खेळीत 4 चौकारांचा समावेश आहे. दीप्ती शर्मा 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फटका मारण्याच्या नादात झेल बाद झाली.

थायलँडचा डाव

भारतानं दिलेलं आव्हान पूर्ण करण्यासाठी नॅन्नपट कोन्चारोनकई आणि नाथाकाल चान्टम ही जोडी मैदानात उतरली. पण दोघंही झटपट बाद होत तंबूत परतले. त्यामुळे संघावर दडपण वाढलं. त्यानंतर नरुएमोल चैवई हीनं संघांची बाजू धरून ठेवली. पण इतर खेळाडूंची साथ तिला मिळाली नाही. एका पाठोपाठ एक करत तंबूत परतले. नरुएमोल चैवईने 41 चेंडूत 21 धावा केल्या.  सॉर्ननरीन टिपॉच (5), चनिदा सुथिरूआंग (1), नत्ताया बूचाथम (21), रोसेनन कनोह (5), फन्निटा माया (0), ओन्निचा बूनसुखाम (0) हे खेडाळू एकापाठोपाठ एक बाद झाले.  भारताकडून दीप्ती शर्माने 3, राजेश्वरी गायकवाडनं 2 गडी बाद केले. तर रेणुका सिंग, स्नेह राणा आणि शफाली वर्मानं प्रत्येकी एक गडी बाद केला. 

T20 World Cup : ना भारत ना न्यूझीलंड, युनिव्हर्सल बॉस म्हणतो, 'हे' 2 संघ फायनल खेळणार!

अंतिम फेरीत भारताचा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील विजयी संघाशी होणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.