हार्दिक पांड्या टेस्ट क्रिकेट का खेळत नाही? BCCI अधिकाऱ्यांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले...

Hardik Pandya News : इशान किशन, कृणाल पांड्या, दीपक चहर यांसारख्या खेळाडूंची गोची होणार असल्याचं स्पष्ट दिसतंय. मात्र, हार्दिक पांड्याला बीसीसीआय सुट का देतीये? असा सवाल विचारला जातोय.

सौरभ तळेकर | Updated: Feb 14, 2024, 08:33 AM IST
हार्दिक पांड्या टेस्ट क्रिकेट का खेळत नाही? BCCI अधिकाऱ्यांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले... title=
Hardik Pandya Test cricket

Hardik Pandya Test Cricket : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या फिटनेसवर लक्ष देताना दिसतोय. सध्या सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Test) यांच्यात सुरू असलेल्या टेस्ट सामन्यात हार्दिकला घेण्यात आलं नाही. त्यामुळे आता हार्दिक पांड्याने टेस्ट क्रिकेटला रामराम ठोकलाय का? असा सवाल विचारला जातोय. 2018 पासून पांड्या कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसलेला नाही. त्याचं कारण 2018 मध्ये त्याच्या पाठीला झालेली दुखापत.. पाठीच्या समस्येमुळे हार्दिकने कसोटी क्रिकेटकडे कानाडोळा केलाय. अशातच पांड्या टेस्ट क्रिकेट का खेळत नाही? असा सवाल विचारला जातोय.

बीसीसीआयने रणजी सामन्यांना दांडी मारणाऱ्या खेळाडूंना कान टोचले आहे. रणजी ट्रॉफी नाही तर आयपीएल नाही, असे सक्त निर्देश बीसीसीआयने (BCCI) दिले आहेत. त्यामुळे आता इशान किशन, कृणाल पांड्या, दीपक चहर यांसारख्या खेळाडूंची गोची होणार असल्याचं स्पष्ट दिसतंय. मात्र, हार्दिक पांड्याला बीसीसीआय सुट का देतीये? असा सवाल विचारला जातोय. त्यावर बीसीसीआय अधिकाऱ्यांनी कारण सांगितलंय.

हार्दिक पांड्या टीम इंडियासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. मात्र, हार्दिकची बॉडी रेड बॉल क्रिकेटसाठी म्हणजेच टेस्ट क्रिकेटसाठी लागणाऱ्या क्षमता पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे  त्याची मर्यादा फक्त व्हाईट बॉल क्रिकेटपूर्ती मर्यादित आहे. आयसीसीच्या मोठ्या सामन्यांमध्ये हार्दिक पांड्या महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. मात्र, इतर युवा खेळाडू फिटनेसच्या नावाखाली रणजी ट्रॉफी स्पर्धेत दुर्लक्ष करत आहेत, असंही बीसीसीआय अधिकाऱ्यांनी मीडिया रिपोर्टनुसार स्पष्ट केलंय.

गेली चार वर्ष टेस्ट टीममधून बाहेर असलेला हार्दिक पुन्हा 2021 मध्ये एकदा या समस्येशी झुंजत होता आणि त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. 2017 मध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने 11 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्याने एक शतक आणि 4 अर्धशतकांसह 532 धावा केल्या आणि 17 विकेट्सही घेतल्या.

दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) इतके बदल झालेले नाहीत पण काळही बदलला आहे, हे मी समजू शकतो. कदाचित हार्दिक पांड्याने कसोटी क्रिकेट सोडलंय, असं म्हणता येईल, असंही लान्स क्लुजनर (Lance Klusener) याने म्हटलं होतं.