कोहलीनंतर वनडेमध्ये कॅप्टनच्या खुर्चीत या 3 खेळांडूंपैकी एक होणार विराजमान!

आता वनडेचं कर्णधारपद कोणत्या खेळाडूकडे जाणार याबाबत प्रश्न आहे.

Updated: Nov 13, 2021, 10:04 AM IST
कोहलीनंतर वनडेमध्ये कॅप्टनच्या खुर्चीत या 3 खेळांडूंपैकी एक होणार विराजमान! title=

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नुकतंच T-20 संघाचं कर्णधारपद सोडलं आहे. त्यानंतर रोहित शर्माकडे T-20चं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. त्याचबरोबर कोहली वनडे संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णयही घेऊ शकतो. याचा खुलासा खुद्द टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केला आहे. त्यामुळे आता वनडेचं कर्णधारपद कोणत्या खेळाडूकडे जाणार याबाबत प्रश्न आहे.

रवी शास्त्री यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, विराट कोहली T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांनंतर इतर फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडू शकतो. अशा स्थितीत वनडे संघासाठीही कर्णधाराची गरज भासणार आहे. ज्यासाठी 3 खेळाडू मोठे दावेदार आहेत.

1.रोहित शर्मा 

विराट कोहलीनंतर रोहित शर्माही टीम इंडियाचा वनडे कर्णधार होण्याचा सर्वात मोठा दावेदार आहे. रोहितकडे नुकतंच टी-20 संघाची कमान सोपवण्यात आली आहे. विराट कोहलीइतका अनुभव कोणत्याही खेळाडूकडे असेल तर तो फक्त रोहित शर्माच आहे. रोहितचा कर्णधारपदाचा विक्रमही उत्कृष्ट राहिला आहे. त्याने कोणत्याही स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केलं तरी संघाची निराशा झाली नाही. याशिवाय रोहित आयपीएलमधील सर्वोत्तम कर्णधार ठरला आहे. 

2. केएल राहुल

रोहित शर्मानंतर केएल राहुल एकदिवसीय संघाचा कर्णधार होण्याचा दावेदार आहे. राहुलने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचं नेतृत्व केलं आहे. या संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आलं नसलं तरी राहुलने कर्णधारपद चोख बजावलंय. याशिवाय कर्णधारपदासह त्याने प्रत्येक सिझनमध्ये 500 हून अधिक धावाही केल्या आहेत. दुसरीकडे, राहुलमधील आणखी एक उत्तम गुण म्हणजे तो एक शांत खेळाडू आहे आणि मैदानावर शांत राहूनच निर्णय घेतो. अशा स्थितीत त्याला नवा कर्णधारही बनवलं जाऊ शकतं.

3. ऋषभ पंत

रोहित आणि राहुल व्यतिरिक्त ऋषभ पंत देखील वनडे संघाचा नवा कर्णधार होण्यासाठी मोठा दावेदार असू शकतो. पंत खूपच तरुण आहे आणि आगामी काळात तो या टीमचं भविष्य आहे. या खेळाडूने फार कमी वेळात टीम इंडियात आपले स्थान पक्कं केलं आहे. इतकंच नाही तर पंतने आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे चांगलं नेतृत्व केलंय.