विदर्भ पुन्हा रणजी ट्रॉफी जिंकण्याच्या उंबरठ्यावर

रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये गतविजेता विदर्भ पुन्हा एकदा विजयाच्या उंबरठ्यावर आहे.

Updated: Feb 5, 2019, 06:40 PM IST
विदर्भ पुन्हा रणजी ट्रॉफी जिंकण्याच्या उंबरठ्यावर title=

नागपूर : रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये गतविजेता विदर्भ पुन्हा एकदा विजयाच्या उंबरठ्यावर आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विदर्भचा स्कोअर दुसऱ्या इनिंगमध्ये ५५/२ असा आहे. सौराष्ट्रच्या धर्मेंद्र जडेजानं विदर्भच्या दोन्ही विकेट घेतल्या. दिवसाअखेरीस गणेश सतीश २४ रनवर आणि वसीम जाफर ५ रनवर खेळत आहे. सध्या विदर्भाकडे ६० रनची आघाडी आहे. विदर्भनं पहिल्या इनिंगमध्ये केलेल्या ३१२ रननंतर बॅटिंगला आलेल्या सौराष्ट्रचा ३०७ रनवर ऑलआऊट झाला. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट सीरिज गाजवणाऱ्या चेतेश्वर पुजाराला विदर्भाचा बॉलर आदित्य सरवटेनं फक्त एक रनवर माघारी पाठवलं, आणि विदर्भाच्या विजयातला मोठा अडथळा दूर केला. आदित्य सरवटेनं सौराष्ट्रच्या ५ विकेट तर अक्षय वाखरेनं ४ विकेट घेतल्या. उमेश यादवला १ विकेट घेण्यात यश आलं. सौराष्ट्रचा ओपनर स्नेल पटेलनं सर्वाधिक १०२ रन केल्या.

विदर्भाचा पहिला डाव ३१२ रनवर संपुष्टात आला होता. अक्षय कर्णेवारने आठ फोर आणि दोन सिक्ससह १६० बॉलमध्ये शानदार दुसरे अर्धशतक पूर्ण केले, तर दुसऱ्या बाजूने खेळणारा अक्षय वाखरेने कर्णेवारला चांगली साथ दिली. या दोघांनी ७८ रनची भागीदारी केली. अक्षय वाखरेने तीन फोरसह ३४ रनचे योगदान दिले. सौराष्ट्रकडून कर्णधार जयदेव उनाडकटने तीन तर चेतन सकारियाने दोन विकेट घेतल्या.