शांत सचिन पहिल्यांदाच भडकला, आफ्रिदीला सुनावलं

नेहमी आपल्या शांत स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पहिल्यांदाच भडकलेला पाहायला मिळाला.

Updated: Apr 4, 2018, 10:50 PM IST
शांत सचिन पहिल्यांदाच भडकला, आफ्रिदीला सुनावलं  title=

मुंबई : नेहमी आपल्या शांत स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पहिल्यांदाच भडकलेला पाहायला मिळाला. शाहिद आफ्रिदीनं काश्मीरबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सचिनचा पारा चढला. आमचा देश चालवण्यासाठी योग्य व्यक्ती आमच्याकडे आहेत. बाहेरच्या लोकांनी आम्हाला आम्ही काय करावं याचे सल्ले देऊ नयेत, असं सचिन तेंडुलकर म्हणाला आहे.

गंभीरचंही सडेतोड प्रत्युत्तर

याआधी क्रिकेटपटू गौतम गंभीरनंही आफ्रिदीला सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं. आपलं काश्मीर आणि यूएनबाबत आफ्रिदीनं केलेल्या ट्विटवर माध्यमांनी माझ्याकडे प्रतिक्रिया मागितली. याबाबत काय बोलायचं? शाहिद आफ्रिदीसारख्या मंदबुद्धीच्या शब्दकोशात यूएन म्हणजे अंडर १९, तेवढं त्याचं वय आहे. माध्यमांनी याबाबत चिंता करु नये. आफ्रिदी नो-बॉलवर विकेट मिळाल्यानंतर आफ्रिदी जल्लोष करतोय, असं ट्विट गौतम गंभीरनं केलं.

कोहलीची प्रतिक्रिया

शाहिद आफ्रिदीला भारताचा कर्णधार विराट कोहलीसह अन्य क्रिकेटपटूंनी खडेबोल सुनावले आहेत. जी गोष्ट भारताच्या हिताला बाधा पोहोचवेल त्याचं मी कधीच समर्थन करणार नाही. एक भारतीय म्हणून देशाचं हित तुमचं पहिले प्राधान्य असेल. मी सुद्धा देशाच्या भल्याचा विचार करतो. कोणी त्या विरोधात असेल तर मी त्याचं कधीच समर्थन करणार नाही, असं कोहली म्हणाला आहे.

काय म्हणाला होता आफ्रिदी

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं काश्मीर प्रश्नात आपलं नाक खुपसलं आहे. भारत व्याप्त काश्मीरमध्ये निष्पाप नागरिकांची हत्या करण्यात येत आहे. स्वातंत्र्य मागणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था आता कुठे आहेत? या संस्था रक्तपात थांबवण्यासाठी कोणताच प्रयत्न का करत नाहीत, असं ट्विट शाहिद आफ्रिदीनं केलं आहे.

१३ दहशतवाद्यांचा भारतानं केला खात्मा

काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं १३ दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर आफ्रिदीनं हे ट्विट केलं आहे. काश्मीरमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या एन्काऊंटरमध्ये १३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. यामध्ये भारताचे तीन जवान शहीद झाले तर ४ नागरिकांना प्राण गमवावे लागले. अरविंदर कुमार, निलेश सिंग आणि सेपॉय हेतराम हे जवान शहीद झाले.

२ दहशतवाद्यांची ओळख पटली

रईस अहमद ठोकर आणि इशफाक अहमद मलिक असं मारण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांची नावं आहेत. या दहशतवाद्यांनी मे २०१७ मध्ये भारतीय लष्कराचे अधिकारी उमर फैयाज यांची सुट्टीवर असताना घरात हत्या केली होती.

याआधीही केलं वादग्रस्त वक्तव्य

याआधी २०१६ साली भारतात झालेल्या टी-20 वर्ल्ड कपवेळी आफ्रिदीनं काश्मीरबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ही मॅच बघण्यासाठी अनेक काश्मिरी आले आहेत, असं आफ्रिदी तेव्हा म्हणाला होता. २०१७ साली निवृत्त झालेला आफ्रिदी पाकिस्तानकडून २७ टेस्ट, ३९८ वनडे आणि ९८ टी-20 खेळला आहे. २०११ सालच्या वर्ल्ड कपमध्ये आफ्रिदीनं पाकिस्तानचं नेतृत्व केलं होतं.