'रोहित स्विच ऑफ झाला, विराट कॅप्टन असता तर..'; माजी कॅप्टनने उडवली हिटमॅनची खिल्ली

Team India If Virat Kohli Was Captain: पहिल्या डावामध्ये भारताने 190 धावांची आघाडी मिळवली होती. या सामन्यावर भारताची मजबूत पकड होती. फिरकी गोलंदाजीला अनुकूल परिस्थिती असूनही भारताचा 28 धावांनी पराभव झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 31, 2024, 04:14 PM IST
'रोहित स्विच ऑफ झाला, विराट कॅप्टन असता तर..'; माजी कॅप्टनने उडवली हिटमॅनची खिल्ली title=
जिंकता जिंकता भारताने सामना गमावला

Team India If Virat Kohli Was Captain: हैदराबादमध्ये भारत आणि इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये भारतीय संघाने सामना अगदी विजयाच्या उंबरठ्यावर असताना गमावला. भारताने पहिल्या डावामध्ये दमदार आघाडी घेतल्यानंतरही या सामन्यात पराभव झाल्याने हा पराभव चाहत्यांच्या जिव्हारी लागला.

रोहितची उडवली खिल्ली

इंग्लंडच्या संघाने 28 धावांनी सामना जिंकल्यानंतर इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आपल्या संघावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहे. दुसरीकडे भारतीय संघावर टीका केली जात आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची खिल्ली उडवली आहे. सामन्यादरम्यानची रोहित शर्माची भूमिका खटकल्याचं सांगताना मायकलने रोहितची टर उडवली आहे. हैदराबादमधील भारताच्या पराभवाबद्दल बोलताना मायकल वॉनने, "विराट कोहली भारताचा कर्णधार असता तर भारताने इंग्लंडविरुद्धचा हैदराबादमधील सामना गमावला नसता. रोहित शर्मा या सामन्यादरम्यान पूर्णपणे 'स्विच ऑफ' झाला," असा खोचक टोला लगावला आहे.

190 धावांची आघाडी तरी 28 धावांनी पराभूत

पहिल्या डावामध्ये भारताने 190 धावांची आघाडी मिळवली होती. या सामन्यावर भारताची मजबूत पकड होती. विराट कोहली या सामन्यामध्ये काही वैयक्तिक कारणामुळे खेळला नाही. फिरकी गोलंदाजीला अनुकूल परिस्थिती असूनही भारताचा 28 धावांनी पराभव झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या विजयासहीत इंग्लंडने 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 ने आघाडी मिळवली आहे. हैदराबादमध्ये भारतीय संघ पहिल्यांदाच पराभूत झाला. विराट पहिल्या कसोटीत खेळला नाही आणि तो विशाखापट्टणममधील कसोटी सामन्यातही खेळणार नाही. कोहीलने 2022 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर उत्तम कामगिरी केल्यानंतर कर्णधारपद सोडलं होतं. भारतीय संघाने आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली होती.

रोहितने काहीच केलं नाही

मायकल वॉनने आपल्या 'क्लब प्रेयरी फायर' या युट्यूब चॅनेलवर बोलताना, 'मला कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीच्या नेतृत्वाची फार आठवण झाली. विराट असता तर भारत या सामन्यात पराभूत झाला नसता,' असं म्हणाला. वॉनने रोहितच्या नेतृत्वावर टीका केली. "रोहित एक ज्येष्ठ आणि महान खेळाडू आहे. मात्र असं वाटलं की तो सामन्यादरम्यान पूर्णपणे स्विच ऑफ झाला," असं म्हटलं. पहिल्या कसोटीमध्ये रोहित फारसा सक्रीय वाटत नव्हता असं म्हणत मायकल वॉनने रोहित शर्मावर निशाणा साधला. 'रोहित शर्माचं नेतृत्व फारच सर्वसाधारण होतं. मला असं वाटलं की तो प्रतिसादच देत नव्हता. त्याने त्याच्या मर्यादेत असलेल्या गोष्टीही योग्य पद्धतीने केल्या नाहीत, असंही मायकल वॉर्न म्हणाला.