IPL 2024 : 'आरसीबीने यंदा आयपीएल जिंकली तर...', इरफान पठाणची मोठी भविष्यवाणी!

Irfan Pathan On RCB : आरसीबी फॅन्सच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारं एक वक्तव्य टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठाण याने केलं आहे. 

सौरभ तळेकर | Updated: Feb 12, 2024, 11:32 PM IST
IPL 2024 : 'आरसीबीने यंदा आयपीएल जिंकली तर...', इरफान पठाणची मोठी भविष्यवाणी! title=
IPL 2024, Irfan Pathan, RCB, Virat Kohli

Royal Challengers Bangalore : जगात साऊथ अफ्रिका अन् आयपीएलमध्ये आयसीबी, असं काहीसं नातं गेल्या 14 वर्षात तयार झालंय. दरवेळी तीच टीम अन् तीच जर्सी... शपथा खाव्यात तर आरसीबी अन् फॅन्स यांच्यातील नात्यांच्या खाव्यात... कारण यांच्यातील नातंच एक अनोखं आहे. ना आरसीबी कधी आयपीएल जिंकली, ना कधी त्यांचे फॅन्स कमी झाले. या नात्याला जोडणारा धागा म्हणजे विराट कोहली (Virat kohli)... कोणत्याही संघाने ऑफर दिली तरी धुडकावून आरसीबी (RCB) फॅन्ससोबत कायम राहिलाय तो किंग कोहली... अशातच आता आरसीबी फॅन्सच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारं एक वक्तव्य टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठाण (Irfan Pathan) याने केलं आहे. 

काय म्हणाला Irfan Pathan? 

मी आरसीबी आणि त्यांच्या चाहत्यांसारखे फ्रँचायझी-फॅनमधलं असं नातं आधी कधीही पाहिलं नाही. त्यांचा संपूर्ण जगात सर्वात निष्ठावंत चाहतावर्ग आहे. त्यांना एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. ते ट्रॉफी जिंकण्यासाठी दोन वेळा जवळ आले होते. 2016 मध्ये विराट कोहलीने जेव्हा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला तेव्हा बंगळुरूकडे विजयाची मोठी संधी होती, असं वक्तव्य इरफान पठाणने केलंय.

2016 चा हंगाम त्याच्यासाठी आणि आरसीबीसाठी खूप खास होता. मला वाटलं की ते त्यांच्यासाठी जिंकण्याचं वर्ष होतं. जर विराट कोहली आणि आरसीबीने यंदा विजेतेपद पटकावलं तर तो केवळ आरसीबीच्या इतिहासाचाच नव्हे तर आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा क्षण असेल, अशी भविष्यवाणी इरफान पठाणने केली आहे.

दरम्यान, 2016 मध्ये बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या फायनल सामन्यात बंगळुरूला फक्त 8 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. विराट कोहलीने 16 सामन्यात 81.08 च्या सरासरीने आणि 152.03 च्या स्ट्राइक रेटने धावा कुटल्या होत्या. त्याने 4 शतके आणि 7 अर्धशतकांसह 973 धावा करून आयसीबीला फायनलमध्ये पोहोचवलं होतं. पण म्हणतात ना, एकटा कोणीही मालिका किंवा स्पर्धा जिंकून देऊ शकत नाही. विराट व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूने त्याला साथ न दिल्याने आरसीबीचं स्वप्न स्वप्नच राहिल्याचं पहायला मिळालं होतं.