IPL Final मधील पराभवानंतर मोहित शर्मा झोपलाच नाही; पहिल्यांदाच खुलासा करत म्हणाला की "ते 2 चेंडू...."

Mohit Sharma IPL Final: आयपीएलच्या (IPL) अंतिम सामन्यात रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) शेवटच्या दोन चेंडूवर विजयी फटकार लगावले आणि चेन्नई सुपरकिंग्सच्या (Chennai Super Kings) विजयाचा शिल्पकार ठरला. यादरम्यान, गुजरातला (Gujarat Titans) सलग दुसऱ्यांदा आयपीएल चषक जिंकवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मोहित शर्मा (Mohit Sharma) मात्र हिरो होता होता राहिला. गुजरातला अगदी विजयाच्या जवळ नेलं असतानाच फक्त दोन चेंडूने त्याचं नशीबच पालटलं.    

शिवराज यादव | Updated: Jun 1, 2023, 12:30 PM IST
IPL Final मधील पराभवानंतर मोहित शर्मा झोपलाच नाही; पहिल्यांदाच खुलासा करत म्हणाला की "ते 2 चेंडू...." title=

Mohit Sharma IPL Final: आयपीएलचा (IPL) अंतिम सामना हा प्रेक्षकांसाठी एक थरारक आणि अविस्मरणीय क्षण ठरला. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या या सामन्याने क्रिकेट चाहत्यांना अक्षरश: पैसा वसूल अनुभव दिला. प्रेक्षकांच्या अपेक्षेप्रमाणे झालेल्या या सामन्याने तर अनेकांना एक अदभूत अनुभव दिला असून अजूनही त्यावरील चर्चा रंगत आहेत. रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) शेवटच्या दोन चेंडूवर विजयी फटकार लगावले आणि चेन्नई सुपरकिंग्सच्या (Chennai Super Kings) विजयाचा शिल्पकार ठरला. यादरम्यान, गुजरातला (Gujarat Titans) सलग दुसऱ्यांदा आयपीएल चषक जिंकवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मोहित शर्मा (Mohit Sharma) मात्र हिरो होता होता राहिला. गुजरातला अगदी विजयाच्या जवळ नेलं असतानाच फक्त दोन चेंडूने त्याचं नशीबच पालटलं.  

अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईसमोर 13 धावांचं आव्हान असताना गुजरातच्या मोहित शर्माकडे त्यांना रोखण्याचं आव्हान होतं. चेन्नईला रोखल्यास सलग दुसऱ्यांदा आयपीएल चषक जिंकण्याची नामी संधी गुजरातकडे होती. दुसरीकडे चेन्नईकडून रवींद्र जाडेजा आणि दुबे मैदानात संघाला पाचव्यांदा आयपीएल चषक जिंकवण्याच्या प्रयत्नात होते. ओव्हरला सुरुवात झाली आणि मोहित शर्माने पहिल्या चार चेंडूत फक्त 3 धावा देत गुजरातच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. कर्णधार हार्दिक पांड्यापासून ते प्रेक्षकांपर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर आता गुजरातच जिंकणार असा आत्मविश्वास दिसत होता. तर दुसरीकडे चेन्नईचे काही चाहते तर शब्दश: रडू लागले होते. जर गुजरात जिंकली असती तर मोहित शर्मा या विजयाचा खरा हिरो ठरणार होता. पण नशीबात काहीतरी दुसरंच लिहिलं होतं. 

पहिल्या चार चेंडूत 3 धावा देत जबरदस्त गोलंदाजी करणाऱ्या मोहित शर्माला शेवटचे 2 चेंडू मात्र महाग पडले. पहिल्या चार चेंडूंप्रमाणे त्याने यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, पण पाचव्या चेंडूवर रवींद्र जाडेजाने षटकार ठोकला. आता एका चेंडूत 4 धावांची गरज होती. कोण जिंकणार हे अद्यापही समजत नव्हतं. स्टेडिअममध्ये भयाण शांतता पसरली आणि मोहित शर्माने टाकलेल्या शेवटच्या चेंडूवर जाडेजाने चौकार लगावत चेन्नईला विजय मिळवून दिला. यानंतर एकीकडे चेन्नई संघ आनंद साजरा करत असताना मोहित शर्मा मात्र खाली कोसळला होता. त्याला अश्रू अनावर होत होते. त्याने केलेले प्रयत्न कमी पडले होते.  

या सामन्यानंतर मोहित शर्मा रात्रभर झोपला नाही. आपण अजून कोणत्या वेगळ्या प्रकारे गोलंदाजी करु शकलो असता याचा विचार तो रात्रभर करत राहिला. इंडियन एक्स्प्रेशी बोलताना मोहित शर्माने अंतिम ओव्हरसाठी आपण केलेली तयारी आणि योजना याबद्दल सांगितलं. 

"मला काय करायचं आहे हे माझ्या डोक्यात स्पष्ट होतं. अशा परिस्थितीत कशी गोलंदाजी करायची यासाठी मी नेटमध्ये सराव केला होता. अशा स्थितीत मी याआधीही खेळलो आहे. त्यामुळे मी सर्व चेंडू यॉर्कर टाकत होतो. माझ्या इंस्टिक्टप्रमाणे मी गोलंदाजी करत होतो," असं मोहित शर्माने सांगितलं. 

"माझी योजना काय होती हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. मी पुन्हा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करेन असं सांगितलं होतं. आता लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलत आहेत. पण त्याला काहीच अर्थ नाही. मला काय करायचं ते माहिती होतं," असं मोहित शर्माने म्हटलं आहे.

"मी शेवटच्या चेंडूवरही यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. मी संपूर्ण आयपीएलमध्ये हेच केलं होतं. पण बॉल जिथे पडायला नको होता तिथेच पडला आणि जाडेजाची बॅट लागली. मी सर्व प्रयत्न केल," असं मोहित शर्माने सांगितलं आहे.

पुढे त्याने सांगितलं की "मी झोपू शकलो नाही. मी काय वेगळं केलं असतं तर जिंकलो असतो असा विचार करत होतो. चेंडू वेगळ्या पद्धतीने टाकला असता तर? आता याबद्दल वाईट वाटतं. मी आता हे सर्व मागे सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे". 

"मला अचानक संधी देण्यात आली. मला आठवते की मी सीझनच्या आधी अनी भाई (अनिरुद्ध चौधरी) यांच्याशी बोललो होतो, मी काय करू? मी खेळणं पुढे चालू ठेवू की नाही. त्यांनी मला खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं सांगितलं होतं. मला काहीच अपेक्षा नव्हती. पण कठोर परिश्रम करत राहिलो. माझी कामाची नैतिकता तशीच आहे. आता पुढे काय होईल हे मला माहीत नाही, पण मी माझ्या प्रवासाचा आनंद लुटला आहे," असं मोहित शर्माने म्हटलं.